‘मी घरी बसून सरकार चालवून दाखवले’; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
क्रांतिकारकांनी बलीदान हे मोदींसाठी नव्हे तर देशासाठी दिले
![Uddhav Thackeray said that I ran the government sitting at home](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Uddhav-Thackeray-1-780x470.jpg)
मुंबई : राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पाला ‘पंचांमृत’ असं गोड नाव दिलं आहे. आता ‘पंचांमृत’ म्हटल्यानंतर हातावर पळीभर पाणी दिलं जातं. त्याने कोणाचंही पोट भरत नाही. ‘पंचांमृत’ या शब्दाचा अर्थ लोकांनी समजून घेतला पाहिजे. कोणालाही आम्ही पोटभर देणार नाही. तुमच्या हातावर जेवढं पडेल तेवढं प्या आणि उर्वरित डोक्यावरून फिरवा, असा त्याचा अर्थ होतो. असा विचित्र अर्थसंकल्प या सरकारने जाहीर केला आहे. या ‘पंचांमृता’तील काही थेंब या सरकारी कर्मचाऱ्यावर उडवायला काहीही हरकत नव्हती, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आपण सर्वांनी एकत्रित लढायला हवे ती इच्छा हवी. अन्यथा देशात हुकुमशाही चालेल. फूटीचा शापाची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये. मी नसलो तरी चालेल पण या देशातील लोकशाही जगली पाहिजे. क्रांतीकारकांनी जे बलिदान दिलं ते मोदींसाठी नव्हे देशासाठी केले, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
माझ्यावर नेहमी आरोप केले जातात. त्यात काही वावगं वाटत नाही मी घरी बसून सरकार चालून दाखवले. घरी बसुन मी जे काही करू शकलो ते गुवाहाटीला जावून करू शकले नाहीत. त्याला मी काय करू शकतो, असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला लगावला.
राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संप सुरू आहे. जर राज्य सरकारच्या पाठिशी केंद्रातील महाशक्ती आहे. तर पेन्शन योजनेचा आर्थिक बोजा पेलायला राज्य सरकारला काय हरकत आहे? २००५ सालापर्यंत ही पेन्शन योजना सुरू होती. त्यानंतर इतक्या वर्षांनी आढावा घेतल्यानंतर असं लक्षात येतं आहे की निवृत्तीनंतर त्यांना आयु्ष्य जगताना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अशी वेळी त्यांचे म्हणणं ऐकूण घेणं गरजेचं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.