TRP मिळत नसल्यानं ‘सावित्रीज्योती’ मालिका अखेर बंद
!['Savitrijyoti' series finally closed due to non-receipt of TRP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/सावित्रीज्योती.jpg)
पुणे | प्रतिनिधी
‘सावित्री ज्योती’ ही मालिका महात्मा जोतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत मराठी मालिका केवळ मालिकेला टीआरपी नाही म्हणून बंद होत आहे. यावर प्रसिद्ध निर्माते महेश टिळेकरांनी सध्याच्या मालिका आणि त्यातील विषय यावर आपलं परखड मत मांडलेलं आहे.
टिळेकर म्हणाले की, ‘फक्त टीआरपीमुळे जेव्हा चांगलं कथानक असलेली मालिका बंद होते तेव्हा फार वाईट वाटतं आहे. ओंकार गोवर्धन या अभिनेत्याने साकारलेली ज्योतिबा फुले यांची भूमिका आणि तितक्यात ताकदीने सावित्रीबाईंची भूमिका वठवणारी अभिनेत्री अश्विनी कासार यांच्या अभिनयाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. पण या सगळ्यात चांगलं कथानक असूनही आपल्या महापुरुषांच्या जीवनावर, कार्यावर आधारित मालिका पाहायला प्रेक्षकांना उत्साह का नसावा?’
‘नवऱ्याची लफडी, सासू सूनांची भांडणं, येता जाता एकमेकींवर कुरघोडी करणाऱ्या जावा, हे असं सगळं बटबटीत पाहायचीच प्रेक्षकांना, विशेषतः महिला प्रेक्षकांना आवड असते का असा प्रश्न आता उभा राहिलेला आहे. विनोदाच्या नावावर माकडचाळे करून नक्की विनोद कशाला म्हणायचं असा प्रश्न पडतो आहे. पण पाहणारे हसत आहेत यातच आपल्या अभिनयाचं श्रेय आहे असं मानणारे आणि कामाच्या मिळालेल्या पैशांत सुख मानणारे कलाकार आहेत. बऱ्याचदा परिस्थितीमुळे अनेकांना हे करणं भाग पडतं पण काही रिअॅलिटी शोमध्ये विनोदाचा दर्जा आणि मर्यादा राखून लोकांचं मनोरंजन करणारे विनोदी कलाकारही आहेत.’
तुम्हीच विचार करा की प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद होत असल्याचं समजल्यावर ओमकार गोवर्धन, अश्विनी कासार यांच्यासारख्या कलाकारांचा जीव किती तुटत असेल. मालिकेत जीव ओतून काम करूनही टीआरपीच्या स्पर्धेत त्यांची मालिका यशस्वी झाली नाही, याला जबाबदार काळानुसार बदलत चाललेली प्रेक्षकांची आवड आहे की आणखी काही वेगळं कारण आहे यावर विचार करायला हवा.’