चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी; तिघांना अटक
![Telephone bombings in four places; Three arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/arrest-1_20170912029.jpg)
मुंबई |
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर आणि भायखळा रेल्वे स्थानक, तसेच अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर बॉम्ब ठेवल्यात आल्याचा दूरध्वनी शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांच्या नियंत्रणात आल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला; पण हा खोडसाळपणा असल्याचे नंतर स्पष्ट झाले. तीन जणांनी दारूच्या नशेत हे कृत्य केले होते. त्यांना पोलिसांनी ठाण्यातील शिळफाटा परिसरातून अटक केली. गणेश आत्माराम शेळके (३१), राजेश विश्वनाथ कांगणे (३५), रमेश ज्ञानोबा शिरसाठ (३८) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे तिघेही ठाणे जिल्ह्यातील शिळफाट्याजवळील दहिसर-मोरी गावचे रहिवासी असून ट्रक चालक आहेत.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शुक्रवारी रात्री ९.४५ वाजता अज्ञात व्यक्तीने फोन करून तीन रेल्वे स्थानके आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्यात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळांवर गेले. श्वान पथक, एटीएस, जलद प्रतिसाद पथक यांच्या मदतीने तात्काळ सीएसएमटी, दादर, भायखळा रेल्वे स्थानकांची कसून तपासणी करण्यात आली. बच्चन यांच्या बंगल्याची तपासणीही करण्यात आली. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. दरम्यान पोलिसांनी आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यामध्ये राजेश याने फोन केल्याने स्पष्ट झाले.