नवाब मलिकांवरून सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला; म्हणाल्या..
![Sushma Andhare said that Devendrabhau Sardasudda will commit suicide](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Sushma-Andhare-and-Devendra-Fadnavis--780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक सध्या जामिनावर सुटले आहेत. तुरुंगातून सुटून आल्यानंतर आज त्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही हजेरी लावली. नवाब मलिक विधानसभेत पोहोचताच ते सत्ताधारी बाकावर बसले. त्यामुळे नवाब मलिकांनी अजित पवारांना समर्थन दिल्याचं स्पष्ट झालं. यावरून विधान परिषदेत तुफान खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे.
सुषमा अंधारे यांनी एक्सवर पोस्ट करत देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. पूजा चव्हाणचा बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपने केले. त्याच संजय राठोडांना मंत्रिमंडळाच्या पंगतीला बसवून घेतले आणि तेच फडणवीस आज नवाब मलिक यांचे मंत्रिपद का काढून घेतले नव्हते असा प्रश्न विचारतात? देवेंद्रभाऊ सरडासुध्दा आत्महत्या करेल हो, असा खोचक टोला सुषमा अंधारेंनी लगावला आहे.
हेही वाचा – हिवाळ्यात लहान मुलांना न्यूमोनियाचा धोका सर्वात जास्त; अशी घ्या काळजी!
पूजा चव्हाणचा बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपने केले. त्याच संजय राठोडांना मंत्रिमंडळाच्या पंगतीला बसवून घेतले आणि तेच फडणवीस आज नवाब मलिक यांचे मंत्रिपद का काढून घेतले नव्हते असा प्रश्न विचारतात? @Dev_Fadnavis भाऊ सरडासुध्दा आत्महत्या करेल हो!!
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) December 7, 2023
दरम्यान, देशद्रोही म्हणून ज्यांच्यावर टीका केली, त्यानांच तुमच्या सत्तेत सामील करून घेतलं, यावरून सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असं अंबादास दानवे आज विधान परिषदेत म्हणाले. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ज्यांच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली की जेलमध्ये व्यक्ती असतानाही आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही. ते आता ही भूमिका मांडत आहेत. आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही.
मी आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. आमच्या बाजूला अजित दादा मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांच्या बाजूला, भुजबळ बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. देशद्रोह्याचा आरोप झाल्यानतंर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही याचं उत्तर द्या आणि मग आम्हाला प्रश्न विचारा, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.