…म्हणून संजय राऊतांना आता महाभारताचे दाखले द्यावे लागतायत; प्रविण दरेकरांचा टोला
![… So Sanjay Raut now has to give proofs of Mahabharata; Pravin Darekar's Tola](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Pravin-Sanjay.jpg)
मुंबई |
महाविकास आघाडी विस्कळीत होत असल्याने संजय राऊत भांबावले आहेत. त्यामुळे त्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी महाभारताचे दाखले द्यावे लागत असल्याचा टोला विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर धूसफूस, विसंवाद असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. आघाडी करण्यामध्ये संजय राऊतांची महत्त्वाची भूमिका होती. आता हीच आघाडी विस्कळीत होत आहे. त्यामुळे संजय राऊत भांबावले आहेत. त्यामुळे त्यांना महाभारताचे दाखले देत आपली भूमिका, आपलं अस्तित्व कसं योग्य आहे आणि भारतीय जनता पार्टी कशी भूमिकेत आहे, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांचा सुरु आहे, असंही दरेकर म्हणाले.
संजय राऊत यांच्या भूमिका प्रसंगानुरूप बदलत असतात. त्यामुळेच महाविकास आघाडी विस्कळीत होण्याच्या टप्प्यावर असताना भांबावलेल्या राऊतांना महाभारताचे दाखले द्यावे लागत आहेत! pic.twitter.com/bi0i6MFfv1
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 1, 2021
या आधीही दरेकरांनी संजय राऊतांवर शेलकी टीका केली होती. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी, असा सल्ला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला होता. राष्ट्रवादीची चिंता केल्यामुळे शिवसेनेत नाराजी आणि अस्वस्थता असल्याचा दावाही त्यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय संन्यास घेण्याच्या वक्तव्यावरुन संजय राऊत आम्ही फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही, असं म्हणाले होते. त्याचबरोबर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातूनही शिवसेनेने फडणवीसांना चिमटे काढले होते. त्यावर प्रविण दरेकरांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं.