निवडणूक आयोग बरखास्त करून संजय राऊत यांना नेमायचे का?; भाजप नेत्याचं राऊतांना प्रत्युत्तर
![Should Election Commission be dismissed and Sanjay Raut appointed?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/raosaheb-danve-and-sanjay-raut-780x470.jpg)
उद्धव ठाकरे नैराश्यातून अशी विधाने करत आहेत
पिंपरी : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटासा देण्यात आले. यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडण्यात आलं. संजय राऊत यांनी निवडणूक आयोग बरखास्त करा, अशी मागणी केली होती. राऊतांच्या टीकेला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत ठाम असले तरी न्यायालयात काय तो निर्णय होईल. २ हजार कोटी आले कुठून, दिले कोणाला, कोटींचा दावा त्यांनाच माहिती आहे, भाजपने अशा प्रकारचे व्यवहार कधीही केलेले नाहीत. निवडणूक आयोग बरखास्त करून संजय राऊत यांना नेमायचे का? असा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी संजय राऊत यांना लगावला.
उद्धव ठाकरे काय बोलतात आणि त्यांचा बोलविता धनी कोण आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हा देश लोकशाहीला मानणारा आहे. लोकशाहीविरोधात जो पक्ष काम करेल, त्यांना जनता जागा दाखवून देईल. लोकशाहीप्रमाणे यांनी कधी पक्षाच्या निवडणुका घेतल्या नाहीत. लोकांना काय लोकशाही दाखवतात, खरे हुकुमशाह हे आहेत. उद्धव ठाकरे नैराश्यातून अशी विधाने करत आहेत, अशी टिका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.