‘मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा विश्वास राहिला नाही’; शरद पवारांचा हल्लाबोल
मुंबई | शरद पवार यांनी बारामतीमधील विविध गावांचा दौरा करत शेतकरी मेळावा घेत त्यांचे प्रश्न जाणून घेतले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत लोकांचे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार असल्याचं सांगितलं. तसेच पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा विश्वास राहिला नाही, असा हल्लाबोल शरद पवारांनी केला.
शरद पवार म्हणाले, हा दौरा करत असताना अनेक लोकांनी अनेक प्रश्न मला सांगितले. त्याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांना मी एक पत्र पाठवलं आहे. त्या पत्रामध्ये दुष्काळासह बाकी काही प्रश्न आहेत. या प्रश्ना संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलणार आहे. दौऱ्यात ज्या काही गोष्टी निदर्शनास आल्या त्याबाबत मी एक बैठक घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे विनंती करणार आहे. दुधाच्या प्रश्नासंदर्भातही काही प्रश्न आहेत. दुधासाठी येणारा खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे दुधाची किंमत पाच रुपये प्रतिलटर प्रमाणे वाढून देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करणार आहे.
हेही वाचा – केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा! खरीप पिकांसाठी एमएसपी वाढवण्यास मंजुरी
लवकरच संसदेचं अधिवेशन सुरु होणार आहे. त्यावेळी यासंदर्भात चर्चा होईल. आम्ही यासंदर्भात आता चर्चा केली नाही. काहीही झालं लोकसभा निवडणुकीत ज्यांच्या जास्त जागा आहेत. त्यांना हे पद द्यावं, अशी चर्चा याआधी एकदा झाली होती. आता जास्त जागा या काँग्रेसच्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष ठरवेल की कोणाला विरोधी पक्षनेता करायचं. काँग्रेस पक्षाने घेतलेल्या निर्णयाला आम्ही सहमती देऊ, असं शरद पवार म्हणाले.
भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारच्या विश्वासाला तडा बसला आहे. मोदी कायम सांगत होते की मोदींची गॅरंटी. मात्र आता मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा विश्वास राहिला नाही, हे या निवडणुकीत दिसलं आहे. मोदींची गॅरंटी खोटी निघाली. त्यांनी जे आश्वासन दिले होते ते त्यांनी पूर्ण केले नाही, असंही शरद पवार म्हणाले.