शरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर; म्हणाले, मी कृषीमंत्री असताना..
![Sharad Pawar said that 40 percent export tax was not imposed on onion when I was the agriculture minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Sharad-Pawar-5-780x470.jpg)
मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लावला आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क केंद्र सरकारने परत घ्यावं अशी मागणी शरद पवार यांनी केली होती. यावरून शरद पवार केंद्रत कृषीमंत्री असताना कांद्याला इतका भाव नव्हता, मोदी सरकारने कांद्याला भाव दिला असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं. याला आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवार म्हणाले, केंद्र सरकारचा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा नाही. केंद्र सरकारनं कांद्याला प्रति क्विंटलला २,४१० रुपयांचा दिलेला भाव कमी आहे. त्याऐवजी प्रति क्विंटल चार हजार रुपयांचा भाव द्यावा, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च २,४०० रुपयांमध्ये निघणार नाही. त्यामुळं केंद्र सरकारनं निर्यात शुल्क कमी करावं. मी कृषीमंत्री असताना कांद्यावर कधीही ४० टक्के निर्यात शुल्क लावलं नव्हतं असा पलटवार शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
हेही वाचा – ‘आजकाल कोण कोणत्या पक्षात हेच कळत नाही’; इंदुरीकर महाराज यांचं मिश्किल विधान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ?
केंद्रानं दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पवारांवर टीका केली होती. पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना असा निर्णय कधी झाला नसल्याचं शिंदेंनी म्हटलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, पवार साहेब मोठे नेते आहेत. तेही १० वर्ष कृषीमंत्री होते. त्यांच्या काळातही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण कांद्याला भाव देण्याचा निर्णय त्या संकटकाळात घेण्यात आला नव्हता.
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर संकट आलं तेव्हा पंतप्रधान मोदी उभे राहिले आणि त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. त्यामुळे याचं राजकारण करण्यात येऊ नये. केंद्र सरकारनं केलेल्या कामाचं राजकारण न करता स्वागत झालं पाहिजे. केंद्र सरकारनं नाफेडमार्फत दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. केंद्र सरकारनं प्रति क्विंटल दोन हजार ४१० रुपये दरानं कांदा खरेदी करण्याचा निर्णय पहिल्यांदाच घेतला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.