शहा-शिंदे भेट नाराजीची नव्हे!, बावनकुळे म्हणाले ‘त्या’ बातम्या कपोलकल्पित…

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झालेली भेट ही महायुतीच्या विजयासाठीची रणनीती आणि प्रशासनिक समन्वयासाठी होती. या भेटी वरुन येत असलेल्या नाराजीच्या बातम्या “कपोलकल्पित” आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे स्पष्ट केले.
ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट नाराजीची नव्हती. त्यांच्या भेटीत महायुती ५१ टक्के मतांनी जिंकावी यावर चर्चा झाली, असे बावनकुळे म्हणाले. मी स्वतः दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांना भेटलो. ते कुठेही नाराज नव्हते. एनडीएमध्ये नियमितपणे नेते एकमेकांना भेटत असतात.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पक्षांतराविषयी ते म्हणाले, “समन्वय समितीने एकमेकांच्या पक्षातील प्रवेश टाळण्याचे ठरवले असले, तरी उमेदवारी न मिळाल्याने काही कार्यकर्ते पक्ष बदलतात. माझ्या कामठी मतदारसंघातही असेच झाले. त्यामुळे महायुतीत कुठलीही गडबड नाही.
डोंबिवलीतील पक्षप्रवेशावर बोलताना बावनकुळे म्हणाले, “उमेदवारी न मिळाल्यानंतर कार्यकर्ते हालचाल करतात. यासाठी एकनाथ शिंदे अमित शहांकडे जाण्याची शक्यता नाही. तक्रारी असल्यास ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही तर माझ्याकडे येतील, असे बावनकुळे म्हणाले.
ओबीसी आरक्षणाबाबत ते म्हणाले, “सुप्रीम कोर्टाने ३१ जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. ओबीसींचे २७ टक्के आरक्षण कायम राहिले पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे.
पुण्यातील जमीन घोटाळ्याच्या चौकशीबाबत ते म्हणाले, “राजेंद्र मुठे समिती अस्तित्वातच नव्हती. स्थानिक समितीने केलेल्या अहवालानुसार प्राथमिक कारवाई केली आहे. आता विकास खारगे यांच्या अध्यक्षतेतील उच्चस्तरीय समितीचा अहवाल निर्णायक ठरेल. व्यवहार रद्द करणे आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. ४२ कोटींची नोटीस दिली आहे. यातून कोणीही सुटणार नाही.”
भाडेकरूंसाठी घेतलेल्या निर्णयाबाबत ते म्हणाले, “रीडेव्हलपमेंटमध्ये ६०० चौरस फुटांपर्यंत घर मिळाल्यास मुद्रांक शुल्क लागू होणार नाही. तसेच १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंतची तुकडेबंदीतील बांधकामे नियमित करण्यात येणार असून साठ लाख कुटुंबांना याचा फायदा मिळेल.
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांवर टीका करताना ते म्हणाले, “वडेट्टीवार–पटोले–केदार यांच्यात समन्वयच नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात असून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. २०२९ मध्ये काँग्रेस महाराष्ट्रातील सर्वात छोटी पार्टी राहील असे बावनकुळे म्हणाले.




