अनधिकृत टपऱ्या, पत्राशेड वाचवण्यासाठी सेना-राष्ट्रवादीचा ‘ राजकीय दबाव’
![अनधिकृत टपऱ्या, पत्राशेड वाचवण्यासाठी सेना-राष्ट्रवादीचा ‘राजकीय दबाव’](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/s4.jpeg)
- प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील कारवाई थांबवणार
- नाशिक फाटा ते मोशी रस्त्यावरील पत्राशेडधारकांना दिलासा
पिंपरी । प्रतिनिधी
पुणे-नाशिक मार्गावरील अत्यंत वर्दळीचा पट्टा अर्थात नाशिक फाटा ते मोशीपर्यंतच्या महामार्गालगत असलेल्या अनधिकृत टपऱ्या आणि पत्राशेडवरीला महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी ‘राजकीय दबाव’ निर्माण केला आहे. त्यामुळे प्रशासक व आयुक्त राजेश पाटील अतिक्रमण कारवाई थांबवणार का? अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नाशिकफाटा ते मोशी या रस्त्यावर असणा-या पत्राशेडवर कारवाई संदर्भात महापालिकेने नोटीस दिल्या आहेत. संबंधित रस्त्याचे रुंदीकरणाचे काम प्रस्तावित आहे. वाहतूक कोंडीमुळे या मार्गाला अतिक्रमण मुक्त करुन मोकळा श्वास घेता यावा. याकरिता महापालिका प्रशसानाने अतिक्रमण कारवाई सुरू केली आहे. धडाडी पथकाच्या माध्यमातून ही कारवाई सुरू असून, बेकायदा उभारलेल्या पत्राशेड आणि टपऱ्या काढून घेण्याबाबत संबंधितांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.
मात्र, प्रशासनाने कारवाई करण्याची भूमिका घेतल्यामुळे महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी बेकायदा टपऱ्या आणि पत्राशेडधारकांना दिलासा देण्यासाठी पुढे आले आहेत. त्यासंदर्भात सोमवारी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, नगरसेवक रवि लांडगे, वसंत बोराटे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, भोसरी विधानसभा अध्यक्ष उत्तम आल्हाट, विजय सस्ते, हरिभाऊ सस्ते, संतोष बोराटे, गणेश सस्ते,वासुदेव आल्हाट, सुरेश बनकर, उदय तापकीर, संजय सस्ते,राहुल सस्ते , विशाल सस्ते व बाधित नागरिक उपस्थित होते.
आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसमोर शहरातील भाजपाच्या दोन्ही आमदारांचे प्रमुख आव्हान राहणार आहे. त्यामुळे शहरातील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी एकवटले आहेत. भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. ज्या ठिकाणी मोकळ्या जागा आहेत. त्या ठिकाणी अनधिकृत टपऱ्या आणि पत्राशेड उभारण्यात येत आहेत. परिणामी, शहराचे विद्रुपीकरण होत आहे. शहराचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी मोहीम हाती घेतली. मात्र, काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते धनंजय आल्हाट यांनी विरोध केला. त्यानंतर आता पुन्हा सेना-राष्ट्रवादीचे पदाधिकारी आयुक्तांना भेटले आहेत. त्यामुळे प्रशासनाला अनधिकृत टपऱ्या आणि पत्राशेडवरील कारवाई थांबवावी लागते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- महापालिका आयुक्त अधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार…
या बाधित नागरिकांना महामार्गापासून २५ फुटाच्या बाहेर कारवाई न करता दिलासा देऊन त्यांना उदरनिर्वाहापासून दुर करू नये , तसेच ज्यावेळी महामार्गाचे रुंदीकरण सुरू होईल त्यावेळी रुंदीकरणाने बाधित मिळकती नागरीक स्वतःहून काढून घेतील असे आश्वासन शिष्टमंडळाने आयुक्तांना दिले. यावर संबंधित विभागातील अधिका-यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगण्यात आले, असे सांगण्यात आले.