आम्ही जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही; संजय राऊत यांचा अमित शाह यांना टोला!
![Sanjay Raut said that we are not members of Jinnah fan club like him](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Sanjay-Raut-and-Amit-Shah-780x470.jpg)
मुंबई | महाराष्ट्रातील महाविकास आघाडी म्हणजे ‘औरंगजेब फॅन क्लब‘ आहे आणि या औरंगजेब फॅन क्लबचे नेते हे उद्धव ठाकरे आहेत, अशी टीका अमित शाह यांनी पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना केली होती. शाह यांच्या या टीकेला आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, आम्ही जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही, असा टोलाही लगावला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, औरंगजेब फॅन्स क्लबचे सदस्य असं म्हणत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की आम्ही त्यांच्यासारखे जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही. आम्ही पाकिस्तानात जिनांच्या कबरीवर जाऊन कधी फुलं उधळली नाहीत किंवा पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केकही खाल्ला नाही. मुळात देशातील राष्ट्रवादी मुस्लीमांची बाजू मांडणं यात काहीही चुकीचं नाही. या देशाच्या संघर्षाच्या काळात मुस्लिमांनीही योगदान दिलं आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा; कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुळात लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील भाजपाचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्रात येऊन अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मात्र, तरीही महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा दारुण पराभव केला. त्याचा हा आक्रोश आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे राज्याच्या राजकारणातील सन्मानीय व्यक्ती आहेत. आम्ही भाजपाप्रमाणे खोट्याच्या मशीन लाऊन काम करत नाही. आम्ही ईव्हीएम, निवडणूक रोखे आणि ईडी-सीबीआयचे घोटाळे करून निवडणूक जिंकत नाही. आम्हाला जनतेने स्वच्छ आणि स्पष्ट मार्गाने विजयी केलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
कालच्या सभेत देवेंद्र फडणवीस कशाप्रकारची भाषा वापरली, हे सर्वांनी बघितलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना ठोकून काढा, असं फडणवीस म्हणाले. ही कुठली भाषा आहे? राज्याचे गृहमंत्री एका गुंडासारखी भाषा वापरता, हे दुर्दैवी आहे, आज राज्याची कायदा सुव्यस्था बिघडली आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. चोरीच्या घटना घडत आहे, असं असताना राज्याचा गृहमंत्री ठोकशाहीची भाषा करतो? फडणवीसांनी आधी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि मग ठोकशाहीची भाषा करावी. मग ठोकशाही काय आहे हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवून देईल, असंही संजय राऊत म्हणाले.