‘मराठी माणसावर हल्ला, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे’, संजय राऊतांची मागणी
![Sanjay Raut said that the Chief Minister should resign.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/Sanjay-Raut-780x470.jpg)
मुंबई | कल्याणच्या योगीधाम परिसरातील एका सोसायटीमध्ये मराठी माणसाला अखिलेश शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना १० ते १२ टाके पडल्याचं सांगितलं जात आहे. आता या प्रकाराची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, की कल्याणमध्येच नव्हे, तर मुंबईतही हे असे प्रकार घडले आहेत. मी वारंवार बोलतोय, कल्याणमध्ये मराठी माणसावर परप्रांतीयांनी काल हल्ले केले. मराठी माणसं घाणेरडे आहेत असं म्हटलं. शिव्या घातल्या. मुंबईतही मराठी बोलायचं नाही वगैरे म्हणत मराठी माणसाला जागा नाकाल्या जात आहेत.
हेही वाचा – आमदार लांडगे यांची लक्षवेधी, महानगरपालिका प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर!
महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना निर्माण केली. भाजपानं मराठी माणसाची संघटना फोडून मराठी माणूस कमजोर केला. इथे मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळावी, मराठी माणसाची लढण्याची ताकद नष्ट व्हावी यासाठी हे केलं. मुबई अदाणी, लोढा, गुंदेचा व्यापाऱ्यांच्या घश्यात घालावी यासाठी मोदी-शाहा व त्यांच्या व्यापारी गोतावळ्यानं मराठी माणसाला कमकुवत केलं आहे. निवडणूक निकालांनंतर मराठी माणसावर हल्ले वाढू लागले आहेत. मराठी माणसाला मुंबईतून घालवण्याचे उद्योग चालू आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
स्वत:ला जे शिवसेना समजतायत, मोदी-शाहांनी ज्यांच्या हातात शिवसेना चिन्ह दिलं, त्या नामर्द लोकांना कालची कल्याणमधील घटना टोचते आहे का? आम्ही बघू काय करायचं ते. मराठी माणसाबाबत ज्यांना वेदना आहे त्यांनी एकत्र यायला पाहिजे. एकनाथ शिंदे नामर्द आहेत. सत्तेसाठी लाचार आहेत. काल मराठी माणसावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला हवी. आपण महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे प्रतिनिधी आहात ना? तुम्हाला लाज वाटली पाहिजे. दोन उपमुख्यमंत्री आहेत. तुम्ही स्वत:ला कसले मराठी समजता? असा सवाल संजय राऊतांनी केला.