‘विधानसभा निवडणुकीत मविआ १८० ते १८५ जागा जिंकणार’; संजय राऊतांचा मोठा दावा
![Sanjay Raut said that Mavia will win 180 to 185 seats in the assembly elections](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Sanjay-Raut-780x470.jpg)
मुंबई | लोकसभा निवडणुकीत देशपातळीवर भाजपाप्रणीत एनडीएला बहुमत मिळालं असलं, तरी महाराष्ट्रात मात्र महायुतीला मोठा फटका सहन करावा लागला आहे. महाराष्ट्रात २०१९ मध्ये भाजपाला २३ जागा मिळाल्या होत्या, आता भाजपाला ९ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. यावरून संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच विधानसभा निवडणुकीत १८० ते १८५ जागा जिंकणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. विधानसभेला याहून मोठं यश मिळेल. आमच्या जागा चोरण्याचा, विजय चोरण्याचा प्रयत्न झाला. अमोल किर्तीकरांच्या जागेसाठी जो प्रयत्न झाला ते अनेक ठिकाणी झालं. विधानसभा निवडणुकीत ते होणार नाही. आम्ही १८० ते १८५ जागा सहज निवडून येऊ.
हेही वाचा – राज्यातील ‘या’ भागात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार
महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. आधी महाराष्ट्र आणि नंतर पक्ष ही बाळासाहेबांची भूमिका आहे. महाराष्ट्राच्या मुळावर कुणी येत असेल तो आपला असेल तरी त्याला सोडू नका ही त्यांची शिकवण आहे. देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन महाराष्ट्र संपवण्याचा प्रयत्न केला. इथले उद्योग, रोजगार गुजरात खेचून नेत असताना हेच फडणवीस तोंडाला कुलूप लावून बसले. राजकीय विरोधकांवर सूडाच्या कारवाया करण्यात ते आघाडीवर होते. यांनी खोटे पुरावे निर्माण करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला असाही गंभीर आरोप संजय राऊत यांनी म्हटलं आहे. अशा प्रकारची व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणात असावी असं आम्हाला वाटत नाही. लोकशाही संपवण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. न्यायमूर्तींना धमक्या दाखवून किंवा आमिषं दाखवून तुम्हाला राज्य करता येणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
अमोल किर्तीकरांच्या प्रकरणात एकनाथ शिंदेंनी कुणाला धमकावलं? हे त्यांनी सांगावं. कुणाकडून निकाल बदलून घेतला हे सांगावं मग मी त्यांच्या आरोपांचं उत्तर देईन. काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत त्यात शिवसेनेचंही योगदान आहे. आम्ही त्याबाबत वेळ आली चर्चा करु, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.