पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ वाक्याचा उल्लेख करत संजय राऊतांचा खोचक टोला!
![Sanjay Raut said that he has accepted that only Modi name will not get votes](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/narendra-modi-and-sanjay-raut-780x470.png)
मुंबई : अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची चर्चा पाहायला मिळत आहे. मोदींनी आपल्या सव्वा दोन तासांच्या भाषणात फक्त ५ मिनिटं मणिपूरवर भाष्य केलं. इतर वेळ फक्त काँग्रेसवर टीका केली. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक मधून मोदींवर टीका करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं?
अमित शाह यांनी लोकसभेत भाषण करताना २०१९ला शिवसेनेशी युती तुटल्याचा उल्लेख केला. मात्र, युती २०१४ ला पहिल्यांदा तुटल्याची आठवण संजय राऊतांनी आपल्या लेखात भाजपाला करून दिली आहे. “महाराष्ट्र सदनात मोदींनी महाराष्ट्रातील ‘एनडीए’ खासदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत मोदी म्हणाले, ‘शिवसेनेशी युती आम्ही तोडली नाही. त्यांनीच तोडली.’ मोदी यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारावर हे विधान केले. शिवसेना-भाजप युतीचा ‘मित्रकाळ’ २५ वर्षांचा होता व त्या मित्रकाळात मोदी-शाह कोठेच नव्हते. २०१४ सालात गुजरातची ही जोडी दिल्लीच्या राजकारणात अवतरली व त्यांनी ‘मित्रकाळ’ युती तोडली. मोदी २०१९ चा दाखला देतात, पण मुळात ‘युती’ २०१४ सालात भाजपने तोडली. विधानसभेच्या एका जागेवरून भाजपने युती तोडली”.
हेही वाचा – ‘संभाजी भिडेंनी तिरंग्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये’; बच्चू कडू यांचा इशारा
पंतप्रधान मोदी हे सध्या दिल्लीत राज्याराज्यांतील ‘एनडीए’ खासदारांच्या बैठका घेत आहेत. एका बैठकीत ते म्हणाले, ‘आता फक्त माझ्या नावावर मते मागू नका. तुमच्या कामावर मते मिळवा.’ याचा अर्थ असा की, फक्त मोदी नावावर मते मिळणार नाहीत हे त्यांनी स्वीकारले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सदनातील आपल्या भाषणात सामना आपल्यावर टीका करतो याचं दु:ख वाटत असल्याचं विधान केलं. त्यावरूनही संजय राऊतांनी टोला लगावला आहे. ‘सामना’ माझ्यावर सातत्याने टीका करतो, असा नाराजीचा सूर पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र सदनात काढला. तो तितकासा बरोबर नाही. फडणवीस वगैरे लोक नेहमी सांगतात, ‘आम्ही ‘सामना’ वाचत नाही.’ पण त्यांचे सर्वोच्च बॉस ‘सामना’ची दखल घेतात व त्यावर भाष्य करतात हे चांगल्या नेत्याचे लक्षण. टीकाकारांचे विचार समजून घेतले पाहिजेत. हीच खरी लोकशाही, अशी टिप्पणी राऊतांनी केली आहे.