‘योगींनी युपीतच थांबावं, तिथे भाजपाची..’; संजय राऊतांचा हल्लाबोल
![Sanjay Raut said that BJP's situation is serious where Yogi Adityanath should stop in Uttar Pradesh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Sanjay-Raut-3-780x470.jpg)
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात थांबायला हवं. तिथे भाजपाची परिस्थिती गंभीर आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला. तसेच उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याचं ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, १० वर्ष सत्तेत असतानाही भाजपाला मत मागण्यासाठी देशभर फिरावं लागतं आहे. महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांना यावं लागतं आहे. खरं तर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातच थांबायला हवं. तिथे भाजपाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पंतप्रधान मोदी हे सरकारी खर्चावर देशभरत फिरत आहेत. सरकारी खर्चावर ते निवडणुकीचा प्रचार करत आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे.
हेही वाचा – शरद पवार यांचा मी ऋणी; येत्या 15 दिवसांत दिल्लीत भाजपात परतणार : एकनाथ खडसे
उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सकाळी ११ वाजता महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे सर्वच मोठे नेते उपस्थित राहतील. महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी नाही, हे सांगणारी ही पत्रकार परिषद असेल, खऱ्या अर्थाने बिघाडी असेल तर ती महायुतीत आहे. आम्ही एकत्र आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असं काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले. याबाबत विचारलं असता, उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आहे. याचा अर्थ सर्व मतभेद दूर झाले आहेत. कोणीही टोकाची भूमिका घेतलेली नाही. आगाडी-युती करताना जागावाटपावरून एखाद्या जागेवरून थोडेफार मतभेत होऊ शकतात. ते दूर केले जाऊ शकतात, असं संजय राऊत म्हणाले.