संजय राऊत बनलेत महाराष्ट्राचे राहुल गांधी, 2000 कोटींच्या डीलच्या वक्तव्यावर भाजप नेते शहजाद पूनावाला यांचा पलटवार
![Sanjay Raut has become Maharashtra's Rahul Gandhi, BJP leader Shehzad Poonawala's counter statement on the 2000 crore deal statement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Untitled-design-3-780x470.jpg)
मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह हडप करण्यासाठी आतापर्यंत दोन हजार कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या विधानावर हल्लाबोल करताना भाजप नेते शहजाद पूनावाला म्हणाले की, उद्धव आणि त्यांच्या गटाच्या वक्तव्याला कोणीही गांभीर्याने घेत नाही. पूनावाला यांनी संजय राऊत यांची तुलना राहुल गांधींशी केली आहे. पूनावाला म्हणाले की, घटनात्मक संस्थांवर प्रश्न उपस्थित केल्याने ते राहुल गांधींची भाषा बोलत असल्याचे दिसून येते.
संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत भाजप नेते शहजाद पूनावाला म्हणाले की, ‘राजकीय निराशा लपवायची आहे, कुटुंबाला वाचवायचे आहे, त्यामुळेच निवडणूक आयोगाला टार्गेट केले जात आहे. संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर केलेला आरोप बेताल आणि हास्यास्पद आहे. आज महाराष्ट्रात संजय राऊत, उद्धव सेना आणि मंडळी यांना कोणीही राजकीयदृष्ट्या गांभीर्याने घेत नाही किंवा त्यांच्याकडे फारसे राजकीय वर्चस्व राहिलेले नाही. निवडणूक आयोगाचा आदेश तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता. मात्र संवैधानिक संस्थांवर प्रश्न उपस्थित करून उद्धव सेना काँग्रेस आणि राहुल गांधींचा स्वभाव दाखवत आहे.
राऊत यांच्या विधानाला निवडणूक आयोगाच्या आदेशावरून खडेबोल सुनावत पूनावाला म्हणाले, ‘संजय राऊतजी आज राहुल गांधींची भाषा बोलू लागले आहेत. निवडणूक हरल्यावर ते निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करतात. केस हरल्यास ते सर्वोच्च न्यायालयावर प्रश्न उपस्थित करतात. ते इतर संस्थांवर प्रश्न उपस्थित करतात. यावरून आज केवळ निवडणूक चिन्ह गेले नाही तर बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची विचारधाराही गेली आहे.
काय म्हणाले संजय राऊत
संजय राऊत यांनी आपल्या आरोपात म्हटले आहे की, ‘मला खात्री आहे की शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचे सौदे आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा असून 100 टक्के खरा आहे. लवकरच अनेक गोष्टी उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.