७० हजार कोटींच्या आरोपांचे पुढे काय झाले? संजय राऊतांचा सवाल

मुंबई | पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाचने भ्रष्टाचाराचा कळस गाठला. भाजपच्या स्थानिक नेत्यांना भ्रष्टाचारातून परिवाराला मोठे करण्याची राक्षसी भूक लागली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपावर केली. तसेच माझ्यावर ज्यांनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते, आता मी त्यांच्याबरोबरच सत्तेत आहे, असेही ते म्हणाले होते. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले, अजित पवारांवर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप आम्ही केला नव्हता. भाजपाच्या भोपाळ येथील मेळाव्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर आठ दिवसांनी अजित पवार मंत्रिमंडळात सामील झाले. त्यामुळे सिंचन घोटाळ्याचे पुढे काय झाले? याचे उत्तर भाजपाने दिले पाहिजे.
हेही वाचा : भाजपा स्वतंत्र संघटना, संघाचा कोणावरही रिमोट कंट्रोल नाही; सरसंघचालक मोहन भागवत
अजित पवारांचा वेगळ्या मार्गाने जाण्याचा इरादा दिसत आहे. भाजपा खा खा खातोय आणि त्यांना खाणे सोयीचे व्हावे, यासाठी त्यांनी इतर पक्षातील खाणाऱ्या लोकांना बरोबर घेतले आहे. भाजपा पक्ष लूट करत असेल, भ्रष्ट मार्गाने मालमत्ता गोळा करत असेल आणि सत्तेतील उपमुख्यमंत्री अशाप्रकारचा आरोप करत असतील तर याचा अर्थ जनतेने काय घ्यायचा? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
अजित पवार भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतील तर ते सरकारमध्ये का राहिले आहेत? त्यांनी शरद पवारांबरोबर परत आले पाहिजे, असेही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्यांची युती झालेलीच आहे. अमित शाहांनी त्यांच्या हातात दिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळ त्यांचा नाही, तो शरद पवारांचा आहे. हे त्यांनाही माहीत नाही, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.




