उर्फीच्या वादावरून रूपाली चाकणकर यांची चित्रा वाघ यांच्यावर टिका
![Rupali Chakankar criticizes Chitra Wagh over Urfi's controversy](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/chitra-wagh-and-rupali-chakankar-780x470.jpg)
आयोगाने काय करावं हे कोणी सांगायची गरज नाही
मुंबई : सोशल मीडियावर कायम उर्फी जावेद सध्या चर्चेत असते. काहीदिवसांपासुन सुरू असलेला उर्फी जावेद आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील वाद टोकाला पोहचला आहे. राज्य महिला आयोग समर्थन करत आहे का?, असा सवाल वाघ यांनी केला होता याला महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
राज्य महिला आयोगाकडे आत्तापर्यंत 10 हजार 907 तक्रारी आल्या. त्यापैकी 9 हजार 520 तक्रारी आम्ही निकाली काढल्या आहेत. त्यामुळं राज्य महिला आयोग व्यापक स्वरूपात काम करत आहे. तेंव्हा आयोगाने काय करावं हे कोणी सांगायची गरज नाही, असं प्रत्युत्तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच नाव न घेता दिले.
ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहेत, असे खासदार राहुल शेवाळे सार्वजनिक कार्यक्रमात व्यासपीठावर बसतात, मात्र त्यावेळी ताई गांधारीच्या रुपात असतात. ज्या महिला सातत्याने त्यांच्याकडे तक्रार करत आहेत. त्यांच्याकडे देखील वाघ यांनी पहावं, अशी टीका रूपाली चाकणकर यांनी केली.
संविधानाने प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र दिले असून कोणी काय घालावे हा त्यांचा अधिकार आहे. शील आणि अश्लील शब्दाची व्याख्या संकल्पना ठिकाणी आणि काळानुसार बदलत राहते. हि सीमारेषा धूसर असल्याने आयोग आपला वेळ अशा गोष्टींवर वाया घालणार नसल्याचं चाकणकर म्हणाल्या. कोणी काय कपडे घातले याचा इतिहास काढला तर त्यांना देखील उत्तरे द्यावी लागतील, अशी टीका वाघ यांच्यावर केलीय.