“अजितदादांनी ठोस तरतुदी केल्या, तशा सप्तर्षीमध्ये दिसत नाहीत”; राष्ट्रवादीचा केंद्र सरकारला टोला
![Rohit Pawar said that Ajit Dada made concrete provisions, which are not seen in Saptarshi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/ajit-pawar-and-nirmala-sitharaman-780x470.jpg)
युवा वर्ग, बळीराजा, कामगार, असंघटित क्षेत्र यंदाच्या अर्थसंकल्पात नाही
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२३-२४ चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. मोदी सरकारचा अखेरचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात देशाच्या विकासासाठी सात प्राथमिकता सांगितल्या आहेत. त्याला सप्तर्षी असं नाव दिलं आहे. याच सप्तर्षीवरून राष्ट्रवादीने टोला लगावला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत टोला लगावला आहे. त्यांनी, गेल्या अर्थसंकल्पात पंचसूत्रीचा वापर करत अर्थसंकल्पाची फ्रेम कशी असावी याचा उत्तम दाखला तत्कालीन अर्थमंत्री अजितदादांनी दिला होता. याचाच संदर्भ केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही सप्तर्षी वापरताना घेतला असावा,पण अजितदादांनी ठोस तरतुदी केल्या, तशा सप्तर्षीमध्ये दिसत नाहीत. केवळ करपात्र उत्पन्नात सवलत व भांडवली खर्चात वाढ याच जमेच्या बाजू दिसतात. परंतु गत सात वर्षांप्रमाणे केवळ तरतूद करून चालणार नाही तर प्रत्यक्ष भांडवली खर्चही करायला हवा तरच अर्थव्यवस्थेला गती मिळेल. करसवलतीचा लाभ घेण्यासाठी लोकांचं उत्पन्न वाढण्याठीही प्रयत्न करण्याची गरज होती, असं म्हटलं आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला युवा वर्ग, बळीराजा, कामगार, असंघटित क्षेत्र यंदाच्या अर्थसंकल्पात दिसत नाही. पुढच्या वर्षी निवडणुका असूनही यंदाच्या अर्थसंकल्पात गतवर्षीप्रमाणे लोकप्रिय घोषणा झाल्या नाहीत, याचाच अर्थ सरकारला देशाच्या आर्थिक वास्तवाची जाण झालेली दिसते, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
सप्तर्षी म्हणजे नेमकं काय?
सप्तर्षी म्हणजे सात ऋषी. वेद आणि इचर हिंदू ग्रंथांमध्ये सप्तर्षीचा उल्लेख आढळतो. त्यानुसार, समावेशक विकास, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतांचा विकास करणे, हरित विकास, युवा शक्ती, आर्थिक क्षेत्र या सात प्रथमिकचेच्या माध्यमातून सरकार विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे. यालाच सप्तर्षी असं नाव देण्यात आलं आहे.