‘पुणे नाहीतर डोंबिवली शहर आता महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी’; रवींद्र चव्हाण
![Ravindra Chavan said that Dombivli city is now the cultural capital of Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/ravindra-chavan-780x470.jpg)
मुंबई : महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी म्हनून पुणे शहराची ओळख आहे. मात्र आता महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी म्हणून डोंबिवली शहर असल्याचं वक्तव्य मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे. ते डोंबिवलीतील पुस्तक प्रदर्शनादरम्यान बोलत होते.
रवींद्र चव्हाण म्हणाले की, डोंबिवलीच्या मातीतच साहित्य, कला आणि संस्कृतीचं मूळ रुजलं आहे. डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररी आणि अशा अनेक सामाजिक संस्था गेली अनेक वर्षं शहरात विविध उपक्रम राबवून मराठी संस्कृतीची पताका अभिमानाने फडकत ठेवतात. पूर्वी डोंबिवली ही सांस्कृतिक उपराजधानी आहे, असं म्हटलं जायचं.
पण आता डोंबिवली हीच सांस्कृतिक राजधानी आहे, हेच डोंबिवलीकर वारंवार सिद्ध करतात. आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीच्या पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे आयोजित करण्यात आलेली भारतातील पहिली मोफत ‘बुक्स स्ट्रीट’ हे याचंच उत्तम उदाहरण, असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे.