‘राज ठाकरेंची आमच्या युतीला गरज..’; रामदास आठवलेंचं वक्तव्य चर्चेत
शिर्डीचा विकास करण्यासाठी मी पुन्हा उभा राहणार
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चागले संबंध आहेत. मात्र त्यांची आमच्या युतीला गरज नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार केला जावा आणि आरपीआयला मंत्रिपद मिळावं. महाराष्ट्रात एकट्याच्या बळावर यश मिळवणं कठीण आहे. लोकसभेत आम्हाला तीन जागा मिळाव्यात आणि विधानसभेत आम्हाला काही जागा दिल्या जाव्यात अशी आमची मागणी आहे, असं रामदास आठवले म्हणाले.
एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह असलेला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निकालही त्यांच्याच बाजूने लागेल असा विश्वासही रामदास आठवलेंनी व्यक्त केला.
शिवसेनेत जी फूट पडली त्या फुटीला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोन्ही नेते जबाबदार आहेत. त्यांनी आमची साथ सोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले त्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली असंही आठवले म्हणाले.
आमची युती नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली २०२४ च्या लोकसभा निवडणुका जिंकणार आहोत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने काही फरक पडणार नाही. एवढंच नाही तर मी शिर्डीत हरलो पण शिर्डीचा विकास करण्यासाठी मी पुन्हा उभा राहिन. शिर्डीची जनता माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवेल, असंही रामदास आठवले म्हणाले.