‘देवेंद्र फडणवीस मला शिर्डीतून उमेदवारी देणार होते, पण..’; रामदास आठवलेंचं विधान चर्चेत
मुंबई | दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी अधिसूचनाही निघाली पण अजूनही महायुतीत जागा वाटपाचा तिढा काही सुटलेला नाही. अशात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस मला शिर्डीतून उमेदवारी देणार होते पण एकनाथ शिंदे यांना अडचण असल्याने मला उमेदवारी मिळाली नाही, असं ते म्हणाले.
रामदास आठवले म्हणाले की, मला शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मी शिर्डीतून लढलो होतो. त्यावेळी माझा पराभव झाला होता. या निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस मला शिर्डीतून उमेदवारी द्यायला तयार होते. इतकंच नाही तर फडणवीस यांनी मला शिर्डीची जागा मिळावी म्हणून प्रयत्न केले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचण असल्याने मला उमेदवारी मिळाली नाही.
हेही वाचा – मुंबई विमानतळावर ११ कोटींचं कोकेन तर साडेसहा कोटींचं सोनं जप्त
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आरपीआयला किमान एक जागा मिळावी असा आमचा आग्रह होता. पण तसं घडलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मला आश्वासन दिलं आहे की २०२६ चा माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर रिपाईबद्दल विचार केला जाईल. केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद रिपाईला मिळावं यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करणार आहेत. तसंच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हाही रिपाईला पद दिलं जाईल. महामंडळाची दोन चेअरमन पदं आणि जिल्हा कमिटीमध्ये रिपाईला प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचंही रामदास आठवलेंनी स्पष्ट केलं.
मोदी सरकार परत आल्यास देशाचं संविधान बदललं जाईल असा आरोप होतो आहे. यावर विचारलं असता आठवले म्हणाले, या देशाचं संविधान कुणीही बदलू शकत नाही. संविधान बदलणार या फक्त अफवा पसरवल्या जातात. मी मंत्रिमंडळात आहे, संविधानाला हात लावू देणार नाही. मागच्या दहा वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांची कामं पूर्ण केली आहेत. मुंबईतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी १२०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, असं ते म्हणाले.