‘सर्वोच्च न्यायालयाचा निकाल गोंधळात टाकणारा’; राज ठाकरेंची प्रतिक्रिया
![Raj Thackeray said that the verdict of the Supreme Court is confusing](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/raj-thackeray-2-780x470.jpg)
मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कर्टाने निकाल दिल्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बराच गोंधळात टाकणारा आहे. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याप्रकरणी मला न्यायालय किंवा पोलिसांकडून नोटीस येतात. त्यातील त्यांची भाषा वाचल्यावर आपल्याला सोडलंय की अटक केली हेच कळत नाही. इतकी ती भाषा गुंतागुंतीची असते.
हेही वाचा – उद्धव ठाकरेंचा राहुल नार्वेकरांना इशारा; म्हणाले, अध्यक्षांनी काही उलट-सुलट केलं तर..
त्यांनी सांगितलं सगळी प्रक्रिया चुकली, मात्र मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. विधिमंडळातील गट पक्ष समजला जाणार नाही, बाहेरचाच पक्ष म्हणून समजला जाईल. ही गोष्ट झाल्यावर निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं काय होणार? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
या सगळ्यात निवडणूक आयोग एक यंत्रणा आहे, सर्वोच्च न्यायालय ही एक यंत्रणा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता निवडणूक आयोग काय करणार? म्हणून मी हा निकाल प्रचंड गोंधळात टाकणारा आहे. त्यामुळे ही सगळी धूळ खाली बसल्यावर आपल्या सर्वांना नक्की काय झालंय हे कळेल, असंही राज ठाकरे म्हणाले.