‘शरद पवारांनी अजित पवारांमुळे आपला राजीनामा मागे घेतला’; राज ठाकरेंचं विधान
कोकणातले राजकारणी म्हणजे व्यापारी आहेत
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. याला पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला. यानंतर शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला. दरम्यान, यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थितीच कळतच नाही. काही आमदार तर समोर आलं की विचारावंस वाटतं ,काय, सध्या कुठे? इतकं इकडून तिकडे जण सुरु आहे. आणि दुसरीकडे राजीनाम्याचा गोंधळ सुरु होता तो काल संपला. माझं असं मत आहे की शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता पण राजीनामा दिल्यावर अजित पवार ज्या पद्धतीने अरेरावी करत होते ते पाहून पवार साहेबांच्या मनात विचार आला असणार की राजीनामा दिल्या दिल्याची नुसती घोषणा केली तर हा इतका उर्मट वागतोय तर खरंच राजीनामा दिला तर कसा वागेल? उद्या मला पण उर्मटपणे बोलेल. म्हणून पवारसाहेबांनी राजीनामा मागे घेतला.
कोकणाकडे पाहताना मला नेहमी वाईट वाटतं. कोकणाची दुर्दशा झाली आहे त्याला तुम्हीच जबाबदार आहात. कोकणातले राजकारणी म्हणजे व्यापारी आहेत, अशांना तुम्ही परत परत निवडून देणार असाल तर काय वेगळं होणार? मुंबई-गोवा महामार्गाच काम २००७ ला सुरु झालं पण तरीही अजून काम पूर्ण नाही होत ह्याचं कारण निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना माहीत आहे की काम नाही केलं, तरी निवडून देणार आहेतच मग कशाला कामं करायची? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.
मागच्या वेळेला मुंबई-गोवा हायवेवरून प्रवास करताना रस्त्याची दुर्दशा पाहून मी देवेंद्र फडणवीसांना फोन केला मग नितीन गडकरींना फोन केला आणि रस्त्याची काय अवस्था आहे हे सांगितलं तर ते म्हणाले की कॉन्ट्रॅक्टर पळून गेले. काँट्रॅक्टर्स पळून का जातात? मला सांगा एकही लोकप्रतिनिधी विचारतोय का, की कॉन्ट्रॅक्टर का पळून गेला? समृद्धी महामार्ग ४ वर्षात झाला मग १५ वर्षांत मुंबई गोवा महामार्ग का नाही झाला? हा प्रश्न इथल्या लोकप्रतिनिधींना कसा पडत नाही ह्याचं मला आश्चर्य वाटतं, असं राज ठाकरे म्हणाले.