‘महाराष्ट्रात दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन खेळवली जातायत’; राज ठाकरेंचा खोचक टोला
मराठा आरक्षणावरून फक्त राजकारण सुरु - राज ठाकरे
नाशिक | मनसेच्या १८व्या वर्धापन दिनानिमित्ताने नाशिकमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. तसेच, मला कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरवायचं सुख मला नको, माझ्यात आहे ताकद तेवढी, असे सांगून राज ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला.
राज ठाकरे म्हणाले की, मागच्या अठरा वर्षात मी अनेक चढ-उतार पाहिले. यात अनेक उतारच जास्त होते. या उतारात माझे कार्यकर्ते माझ्याबरोबर राहिले. एक दिवस पक्षाला यश मिळलेच आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना यश मिळवून देणारच. यश मिळविण्यासाठी संयम ठेवा. आजकाल सध्या पक्षांतराचा ट्रेंड आहे. पण दुसऱ्यांची पोरं मला कडेवर घेऊन फिरायची नाहीत. मला राजकारणात माझे सहकारी मोठे करायचे आहेत.
हेही वाचा – ‘तुम्ही कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ करुन साम्राज्य उभं केलं’; रोहित पवारांची अजितदादांवर खोचक टीका
पक्ष उभा करणं आणि चालवणं याला हिंमत लागते. आमच्या दहा वर्ष आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. पण तो पक्ष नव्हता तर जिंकून येणाऱ्या आमदारांची मोळी होती. महाराष्ट्रात जर खऱ्या अर्थाने कुठले पक्ष स्थापन झाले असतील तर तो पहिला जनसंघ, शिवसेना आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्ष आहेत. मनसे पक्षात असलेले ९० टक्के कार्यकर्ते कोणत्याही पक्षात नव्हते. सामान्य लोकांना घेऊन आम्ही पक्ष उभा केला, असं राज ठाकरे म्हणाले.
मराठा आरक्षणावरून फक्त राजकारण सुरु आहे. मी जरांगे-पाटील ह्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर सांगितलं होतं… आरक्षण मिळणार नाही. ह्याचा अर्थ मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं नाही तर तांत्रिकदृष्ट्या ते तितकंच किचकट आहे. राज्यात जी मराठा आरक्षणावरून जी आश्वासनं दिली जातात ती सर्व खोटी आहेत. त्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यायला हवा. पण केंद्राने जर मराठा आरक्षण द्यायचं ठरवलं तर त्यांना प्रत्येक राज्यातील आरक्षणाची मागणी असलेल्या जातींना आरक्षण द्यावं लागेल, जे नेत्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरेल म्हणून हा प्रश्न रखडवत ठेवला जातो. आणि जाती भेद निर्माण करून मतांचं राजकारण केलं जातं, असंही राज ठाकरे म्हणाले.