महाराष्ट्र भूषण सोहळ्याला लागलेला गालबोट टाळता आलं नसतं का? राज ठाकरेंचा प्रशासनाला सवाल
महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातानं १२ जणांचा मृत्यू
![Raj Thackeray said, "Couldn't we have avoided the scandal at the Maharashtra Bhushan celebration?"](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/raj-thackeray-780x470.jpg)
मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा पार पडल्यानंतर या कार्यक्रनाला उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूंमुळे गालबोट लागला. यावरून आता महाराष्ट्र सरकारच्या नियोजनावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. सोहळ्याला लागलेला गालबोट टाळता आलं नसतं का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का?
सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी. ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.