राज ठाकरेंकडून ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचं कौतुक; सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाला “खरा समकालीन सिनेमा” असं संबोधत राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलं आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, मी दोन दिवसांपूर्वी, माझे मित्र आणि एक उत्तम दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट पाहिला… समकालीन सिनेमा हा शब्द सहज वापरला जातो पण तो अनेकदा असतोच असं नाही… पण खरा समकालीन, किंवा आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाला पर्याय नाही…
आज फक्त मोठे मोठे महामार्ग, पूल (ज्यावर काही महिन्यात खड्डे पडतात ) आणि चमकदार घोषणा म्हणजे ‘विकास’ अशी कल्पना सत्ताधाऱ्यांनी रुजवली आहे. यांत बाकी कोणाचा विकास होतो की नाही माहित नाही पण सत्ताधाऱ्यांचा विकास नक्की होतो. हे केलं आणि धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की मग शेतकरी असो की इथला मराठी माणूस यांना हवं तसं वापरून फेकून द्यायला हे मोकळे.
हेही वाचा : ‘संतांचे विचार आणि वारकरी परंपरा समाजाला ऊर्जा देणारी’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
या राज्यातील शेतकरी तर पार हतबल आहे. एका बाजूला पाऊस झोडपतो आणि दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणा अनास्थेने झोडपते.. याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, त्याच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतो हे भीषण दुर्दैव आहे. एका बाजूला ग्रामीण भागात शेतकऱ्याला इतकं जेरीस आणायचं की त्याला जमीन विकावीच लागेल आणि दुसरीकडे शहरात मराठी माणसांनाच घरं नाकारायची, त्यांच्या भाषेचा अपमान करणाऱ्यांना अभय द्यायचं, त्यांनी काय खायचं ? काय नाही खायचं यावर बंधन आणणऱ्यांचे लाड करायचे हे सुरु आहे.
हे सगळं मराठी माणसाला दिसत नाहीये का ? दिसत असेल ही… पण जोपर्यंत तुमच्या मनात याविरोधात चीड निर्माण होणार नाही, आग निर्माण होणार नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणं सोडा अजून भीषण होईल. या सिनेमातून ही चीड महेश मांजरेकर, त्यांचे कलाकार आणि त्यांचे लेखक यांनी उत्तम मांडली आहे. हा फक्त चित्रपट नाही तर या टीमच्या मनातील अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता महाराष्ट्रातील जनतेने अनुभवयाला हवी. त्यासाठी माझं तुम्हाला आवाहन आहे की ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट जरूर पहा…अशी पोस्ट राज ठाकरेंनी केली आहे.




