“थोरातांनी खिंड सोडुन पळ काढला ते आता कोणत्या दिशेला जाणार”; राधाकृष्ण विखे-पाटील
![Radhakrishna Vikhe-Patil said that Thorat left the pass and fled](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/balasaheb-thorat-and-radha-krishna-vikhe-patil-780x470.jpg)
पक्षाचा अंतर्गत वादाचा परिणाम महाविकास आघाडीवर झाला आहे
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारीवरून गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. राज्यातील या घडामोडींबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर, मी बाजीप्रभु देशपांडे यांच्यासारखा खिंड लढवणार, अशी भिमगर्जना बाळासाहेब थोरात यांनी केली होती. त्यांनी आता खिंड सोडुन पळ काढला. ते आता कोणत्या दिशेने पळ काढणार हे त्यांनीच सांगावं, अशी घणाघाती टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर केली आहे.
तुम्ही देशातील अध्यक्षांकडे जाऊन भांडा किंवा महाराष्ट्राचे जे प्रभारी असतील त्यांच्याकडे जाऊन भांडा, परंतु पक्षाचा अंतर्गत वादाचा परिणाम महाविकास आघाडीवर झाला आहे. त्याची जबाबदारी थोरात घेणार की नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे, असंही राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.
नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार होता आणि काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. पण काँग्रेसने महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी का प्रयत्न केला नाही, असा सवाल विखे-पाटील यांनी उपस्थित केला.