महाराष्ट्रासमोर हे काय चाललंय? काका-पुतण्याच्या भेटीवर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया
![Prithviraj Chavan said that someone from both the leaders should come in front of Maharashtra and tell what is going on](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Prithviraj-Chavan-780x470.jpg)
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात भेट झाली आहे. उद्योजक अतुल चोराडिया यांच्या पुण्यातील घरी ही भेट झाली. या भेटीला राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित असल्याचं बोललं जात आहे. या भेटीत अनेक राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकारणात भूकंप येण्याची शंका उपस्थित केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाल्याच्या चर्चा आहेत. अजित पवार गटाने जरी भेट झाल्याचं नाकारलं असलं तरी विशेष बाब म्हणजे माध्यमांकडे याचे व्हिडीओ आहेत. दोन्ही मान्यवरांची भेट आता गुप्त राहिली नाही. जर अशी भेट झाली असेल तर दोन्ही नेत्यांपैकी कुणीतरी महाराष्ट्रासमोर येऊन हे काय चाललंय? हे सांगणं गरजेचं आहे. कारण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात दोन बैठका झाल्या. त्यात विविध नेते मंडळीही उपस्थित होते. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.
हेही वाचा – १८ वर्षांखालील मुलाने गुन्हा केला तर पालकांवर होणार कारवाई
काही जणांनी अजित पवारांना १० तारखेच्या सुमारास किंवा कधीतरी मुख्यमंत्री करतो, असा शब्द दिला होता. तो शब्द जर पूर्ण झाला नाही, तर तर त्यांचा पवित्रा काय असणार आहे? यासंदर्भात चर्चा झाल्याचं नाकारता येऊ शकत नाही”, अशी शंका पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केली. तसेच बाकीही नेते इकडे जाणार आहे, तिकडे जाणार आहे, अशा बातम्या सातत्याने येत आहेत. खरतंर राष्ट्रवादी हा पक्ष राष्ट्रीय पक्ष होता. या पक्षाचे वरिष्ठ नेते असे भेटतात, त्याला आपण कौटुंबिक भेट कशी म्हणू शकतो?, असा सवालही त्यांनी विचारला. त्याचवेळी दोघांपैकी एकाने कुणीतरी समोर येऊन स्पष्ट करायला हवं की या भेटी नेमक्या कशासाठी झाल्या? त्यामुळे कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर होईल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.