राष्ट्रपतींकडून मोदींना निमंत्रण, 9 जून रोजी शपथविधी, सरकार स्थापनेची पुढची प्रक्रिया काय?
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सरकार स्थापनेसाठीची प्रक्रिया सुरु झाली आहे. संसद भवनात आज एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीत एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीत नरेंद्र मोदी यांना आपला नेता म्हणून पाठिंबा दिला. राजनाथ सिंह यांनी प्रस्तावाला ठेवल्यानंतर इतर पक्षांनी त्याला पाठिंबा दिला. या निर्णयानंतर एनडीएने राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचा दावा केला. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि पाठिंबा दिलेल्या पक्षांच्या समर्थन पत्र सुपूर्त केलं. यानंतर राष्ट्रपतींनी मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिलेय. ७३ वर्षाचे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक देशाचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यांसाठी बांगलादेश, श्रीलंका, भूतान, नेपाळ, मालदीव आणि मॉरिशस या देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. मी देशवासियांना आश्वासन देतो की, आमच्या पाच वर्षांच्या या कार्यकाळात आम्ही आणखी गतीने आणि समर्पणाने देशाच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम करु. यामध्ये कोणतीही कसर सोडणार नाही.
हेही वाचा – एकनाथ शिंदे यांनी कवितेने श्रोत्यांना केले मंत्रमुग्ध, मोदीही लक्षपूर्वक ऐकत राहिले
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, हा प्रस्ताव म्हणजे 140 कोटी देशातील जनतेच्या हृदयाची घोषणा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मी मान्यता देतो. गेल्या 10 वर्षांत त्यांच्यासोबत काम करण्याचे सौभाग्य आम्हाला मिळाले. आपला देश सुखी, समृद्ध, संपन्न, जागतिक महासत्ता व्हावा आणि समाजाच्या सर्व क्षेत्रात प्रगती व विकास व्हावा यासाठी त्यांनी समर्पित भावनेने काम केले. दहा वर्षांत केलेले काम ही सुरुवात होती, येत्या पाच वर्षांत आपण जगातील एक मोठी शक्ती बनू.
सरकार स्थापनेबाबत पंतप्रधान मोदी मित्रपक्षांशी चर्चा करणार आहेत.
सर्व भागीदार पक्षांच्या एकामागून एक बैठका होणार आहेत.
मित्रपक्ष कोणत्या पक्षाला कोणते मंत्रिपद मिळणार यावर चर्चा होणार आहे.
मंत्रिमंडळाची रचना ठरवल्यानंतर राष्ट्रपतींना माहिती दिली जाईल.
मंत्री होणाऱ्या खासदारांची माहिती राष्ट्रपतींना दिली जाईल.
9 जून रोजी शपथविधी होईल.
पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, आमचा पक्ष भारताच्या पंतप्रधानपदासाठी भाजप संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो. 10 वर्षे पंतप्रधान राहिल्यानंतर ते पुन्हा पंतप्रधान होणार आहेत ही आनंदाची बाब आहे. त्यांनी संपूर्ण देशाची सेवा केली. जे काही शिल्लक आहे ते पुढच्या वेळी पूर्ण होईल असा आम्हाला विश्वास आहे. ते जे काही करतात ते खूप चांगले आहे.
टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू म्हणाले की, आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो, आम्ही जबरदस्त बहुमत मिळवले आहे. मी निवडणूक प्रचारादरम्यान पाहिले आहे की, पंतप्रधान मोदींनी तीन महिने विश्रांती घेतली नाही. त्यांनी रात्रंदिवस प्रचार केला. आंध्र प्रदेशात आम्ही 3 जाहीर सभा आणि 1 मोठी रॅली काढली आणि आंध्र प्रदेशातील निवडणुका जिंकण्यात मोठा फरक पडला.