प्रकाश आंबेडकर यांचा उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम! म्हणाले..
![Prakash Ambedkar's ultimatum to Uddhav Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Prakash-Ambedkar-and-uddhav-thackeray-780x470.jpg)
मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलाढाली होत आहेत. रविवारी (२ जुलै) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राजकारणातील चक्र वेगाने फिरले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा राजकारणात भूकंप होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना अल्टीमेटम दिल आहे.
वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल उद्धव ठाकरेंनी पुढच्या १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी, असा अल्टीमेटम वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. यावर लवकर निर्णय झाला नाही तर आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे असल्याचं मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता ‘या’ पक्षात पडणार फूट
तसेच उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी यासंदर्भात काय बोलणं झालंय हे स्पष्ट करावे आता निवडणुका जवळ आल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी आता न्यायालयीन लढाईच्या पुढे जात भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आमचा उद्धव ठाकरेंमुळे भ्रमनिरास झालेला नाही. मात्र त्यांनी सर्व गोष्टी स्पष्ट कराव्यात असे सांगितले आहे.
शरद पवारांवर होत असलेल्या पेरलं तेच उगवलं या आरोपांमध्ये तथ्य नाही. राजकारणात परिस्थितीनुरूप राजकीय तोडफोडीचे निर्णय घ्यावे लागतात. पवारांनी आतापर्यंत राजकारणासाठी जे केलंय ते आता त्यांच्यासंदर्भात घडले आहे. राजकारणातले रणछोडदास सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे समोर आलेत. चौकशांच्या छायेखालची लोकं अजित पवारांसोबत गेली, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.