सत्तासंघर्ष ः येत्या २४ तासांत हल्ले थांबले नाहीत तर… शरद पवारांचा कर्नाटक सरकारला इशारा
![Power struggle: If the attacks do not stop in the next 24 hours... Sharad Pawar warns the Karnataka government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Sharad-Pawar-1.png)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी।
सीमाभागात जे काही घडतंय ते पाहिल्यानंतर भूमिका घेण्याची वेळ आली आहे. आजचा दिवस खरं म्हणजे ज्यांनी संविधान लिहिलं आणि संविधानामध्ये सर्व भाषिक लोकांना समान अधिकार दिले अशा थोर महात्म्याचं स्मरण करण्याचा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणाच्या दिवशी जे काही महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमेवर घडलं. हे अत्यंत निषेधार्ह आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. येत्या २४ तासांत या वाहनांवरचे हल्ले थांबले नाहीत तर या संयमाला एक वेगळा रस्ता पाहण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे याची संपूर्ण जबाबदारी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि सरकारवर राहणार आहे. अजूनही महाराष्ट्रातील जनतेची भूमिका संयमाची आहे. पण संयमाला मर्यादा येऊ नयेत अशी मनापासून माझी इच्छा आहे. परंतु कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडूनच चिथावणीखोर भूमिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून अशा प्रकारचे हल्ले घडत असतील तर देशाच्या ऐक्याला हा फार मोठा धक्का आहे, असं शरद पवार म्हणाले.
यामध्ये जी काही माहिती आहे. हे प्रकरण गेल्या काही आठवड्यांपासून एका वेगळ्या स्वरुपात नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न हा मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांनी ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांवर विधानं केली. ३० नोव्हेंबरला त्यांनी जत समाजाची भूमिका मांडली. २४ नोव्हेंबरला अक्कलकोट समाजाची भूमिका मांडली. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांचे संस्कार कधीही पूर्ण होणार नाही, अशी टीका त्यांनी केली. कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विविध प्रकारची सातत्याने विधानं केली आहेत. याच पार्श्वभूमीवर सीमाभागात किती गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, असं शरद पवार म्हणाले.
मला स्वत:ला सत्याग्रह करावा लागला. अटकेच्या भूमिकेला तोंड द्यावं लागलं. त्यामुळे या सर्व गोष्टींचा अभ्यास हा माझा अनेक वर्षांचा आहे. त्यामुळे सातत्याने सीमाभागात ज्यावेळी काही घडतं, त्यावेळी कटाकक्षाणं सीमाभागातील अनेक घटक माझ्यासोबत संपर्क साधतात. एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांचे मेसेज आले. एकीकरण समितीच्या कार्यालयासमोर कायम पोलीस तैनात आहेत. सीमाभागातली जनता अनेक समस्यांना तोंड देत आहे. १९ डिसेंबरला कर्नाटक विधानसभेचं अधिवेशन आहे. मराठी लोकांवर बेळगावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. फडणवीसांनी बोम्मईंशी संपर्क केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. एक संयमाची भूमिका आम्ही घेतली आहे. अजूनही घ्यायची तयारी आहे. पण संयमाला सुद्धा मर्यादा असतात, असंही पवार म्हणाले.