#PhoneTapping: मुख्यमंत्र्यांनी मौन का बाळगलंय? खासदार संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले…
!["This does not suit the tradition of dynamic governance in Maharashtra"](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Sanjay-Raut-Uddhav-Thackeray-1.jpg)
मुंबई |
सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पोलीस पदोन्नत्या व बदल्यांमधील भ्रष्टाचारावर पांघरुण घातले गेल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे पुरावे सादर करून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखांनी संबंधितांचे दूरध्वनी टॅप करून पुरावे गोळा केले आणि महासंचालकांमार्फत २५ ऑगस्ट २०२० मध्ये सरकारला अहवाल देऊनही मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही असं फडणवीसांनी म्हटलं आहे. फडणवीसांकडून इतके गंभी आरोप होत असतानाही उद्धव ठाकरेंनी मात्र यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याचं उत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्री या प्रकरणावर कोणतंही भाष्य करत नसल्याचं विचारण्यात आलं आहे. त्यावर ते म्हणाले की, “आम्ही सगळे तानाजी मालुसरे, बाजीप्रभूंचे वंशज आहेत. आमचे जे प्रमुख आहेत त्यांच्यासाठी लढणं आमचं काम आहे. ते मुख्यमंत्री आहेत त्यांना त्यांचं काम करु द्या, आम्ही येथे सगळ्या लढाया लढण्यासाठी सक्षम आहोत”. “मुख्यमंत्री योग्य वेळी समोर येतील आणि जेव्हा ते समोर येतील तेव्हा या तोफा, बॉम्ब यांच्यात काही दम नाही हे कळेल,” असंही ते म्हणाले.
“दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्याने यायला पाहिजे. दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असायला हवा आणि त्यादृष्टीने विरोधी पक्षनेते येत असतील तर त्यांचं स्वागत करायला हवं. काहीतरी कागद घेऊन आले आणि गृहसचिवांना भेटले अशा बातम्या पाहिल्या. तो कागद काही गंभीर नाही. विरोधी पक्षाच्या हातातील कागद गंभीर आहे की नाही हे सरकार ठरवणार. त्या अहवालात काडीचाही दम नाही. तो अहवाल जाहीर करावा, त्यात सरकारला अडचणीत आणेल असं काही नाही. त्याची काय दखल घ्यायची हे मुख्यमंत्री ठरवतील,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. “तो जो काही बॉम्ब घेऊन विरोधी पक्षनेते आले होते तो भिजलेला लवंगी फटाका आहे. त्या फटाक्याला वातसुद्धा नव्हती. आम्ही दिल्लीत कुठे स्फोट झाला, महाराष्ट्रात काही पडसाद उमटतात का पाहत होतो. पण तसं काही दिसलं नाही. बंगालप्रमाणे महाराष्ट्र आणि दिल्लीत ‘खेला होबे’ सुरु आहे. यामुळे लोकांचं चांगलं मनोरंजन होत असून त्यासाठी कोणता मनोरंजन टॅक्सही भरायची गरज नाही,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
“काही चुकीचं झालं असेल तर त्यासाठी महाराष्ट्रातील गृहखातं सक्षम आहे, त्यासाठी केंद्रात येण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते हे महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आले आहेत. त्यांनी त्यांच्याकडील सगळा डाटा घेऊन मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन चर्चा केली तर महाराष्ट्राची भ्रत राहते. पण त्यात काही दम नसल्याने ते दिल्लीत आले. दिल्लीत अशा प्रकारचे भिजलेले फटाके वारंवार वात लावून फोडण्याची दिल्लीला सवय आहे. आम्ही याकडे गंमत म्हणून पाहत आहोत. पुढचा सिनेमा तो कोणता तयार करतायत याकडे आम्ही पाहतोय,” असंही संजय राऊत म्हणाले. “ज्या परमबीर सिंह यांच्या पत्रावरुन सगळा गोंधळ सुरु आहे त्यांच्याच आग्रहाखातर आपण महाराष्ट्रात सीबीआयवर बंदी घातली. तेच परमबीर सिंह सीबीआय तपासासाठी चालले आहेत. त्यात महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस सीबीआय चौकशीसाठी येथे येत आहेत. अशा प्रकारची अनेक पत्रं अनेक राज्याच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना लिहिली आहेत,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
वाचा- जेजुरीत वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; दोन पीडित मुलींची सुटका