ओबीसी मेळाव्याचं निमंत्रण नव्हतं? पंकजा मुंडेंनी सांगितलं अनुपस्थित राहण्याचं कारण..
![Pankaja Munde said that I expected an all-party program on OBC reservation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Pankaja-Munde-780x470.jpg)
मुंबई : जालन्यात काल सर्वपक्षीय नेत्यांची ओबीसी एल्गार सभा पार पडली. या सभेला मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर हे नेते उपस्थित होते. मात्र, भाजप नेत्या पंकजा मुंडे ऐनवेळी अनुपस्थित राहिल्याने राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. दरम्यान, यावर पंकजा मुंडेंनी त्याचं कारण सांगितलं आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, मी ओबीसी आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय कार्यक्रमाला अपेक्षित होते. कारण माझे फोटो बॅनरवर होते. त्यामुळे लोकांना वाटत होतं की मी तिथे उपस्थित राहणार आहे. पण प्रत्येक पक्षानं कोणत्या नेत्यांना पाठवायचं याचा निर्णय घेतला. त्यानुसार आमच्या पक्षाकडून आशिष देशमुख, देवयानी फरांदे व डॉ. महात्मे यांना पाठवलं होतं. ते त्या कार्यक्रमाला गेल्यामुळे मी तिथे गेले नाही.
हेही वाचा – ‘भाजपने ‘टूर अँड ट्रॅव्हल्स’ कंपनी उघडली: राज ठाकरे
मला वाटलं मी या विषयावर गेल्या अनेक वर्षांत अनेक कार्यक्रमांत व्यक्त झाले आहे. ती खेळपट्टी छगन भुजबळांची होती. त्यांनी बॅटिंग करावी असं वाटलं, तशी त्यांनी ती केली आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
निमंत्रण नसल्यामुळे पंकजा मुंडे तिथे गेल्या नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येऊ लागला होता. यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, ओबीसींच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण, मानपानाची कोणतीही आवश्यकता नाही. पण मी या विषयावर इतक्या वेळा व्यक्त झालेय की आता त्यात नावीन्य असण्याची गरज नाही. माझी भूमिका स्वयंस्पष्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे आणि त्यावर लोकांचा विश्वास आहे.