‘जो करेगा जात की बात, उसको कस के मारूंगा लाथ’; नितीन गडकरींचं विधान
![Nitin Gadkari said, "Who will do Jaat ki Baat, how will I kick him?"](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Nitin-Gadkari-780x470.jpg)
Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक वक्तव्यामुळे ओळखले जातात. आता त्यांचं नुकतंच एक विधान चर्चेत आलं आहे. मी जातीपातीचं राजकारण मानत नाही, ‘जो करेगा जात की बात, उसको कस के मारूंगा लाथ असं मी माझ्या मतदारसंघातीन जनतेला सांगितलं आहे, असं नितीन गडकरी म्हणाले. गोव्यात पक्षाच्या एका मेळाव्यात बोलताना त्यांनी हे विधान केलं. त्यांच्या विधानाची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
नितीन गडकरी म्हणाले, महाराष्ट्रात सध्याचं जातीय संघर्षाचं वातावरण बघता या निवडणुकीत आपल्याला अडचण होईल, असं मी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना म्हटलं होतं. मी आधीच ठरवलं होतं की आपण कधीच जातीयवाद पाळायचा नाही. कुठलाही माणूस जातीने मोठा होत नाही, तर तो गुणाने मोठा होता. त्यामुळे जातीवाद समूळ नष्ट झाला पाहिजे. माझ्या मतदारसंघात २२ लाख मतदार आहेत. त्यापैकी ४० टक्के मुस्लीम आणि दलित आहेत. मी लोकांना सांगितलं मी जातपात मानत नाही. तुम्हीही मानू नका, जो करेगा जात की बात उसको मारुंगा कस के लाथ, असं मी माझ्या मतदारसंघातील लोकांना सांगितले आहे.
हेही वाचा – लोणावळ्यातून गांजा विकणाऱ्या टोळीला अटक, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
यंदा माझ्या निवडणुकीच्या प्रचाराला जवळपास १० हजार मुस्लीम लोक उपस्थित होती. यंदाच्या निवडणुकीत मला कमी मतं मिळाली पण काही मुस्लिमांनी मला सांगितले, की आमची इच्छा आहे, पण काही कारणास्तव आम्ही तुम्हाला मत देणार नाही. तेव्हा मी त्यांना सांगितले की मत द्या अथवा नका देऊ. मी तुमची काम नक्कीच करेन, असं नितीन गडकरी म्हणाले.
लालकृष्ण आडवाणी नेहमी म्हणायचे की भाजपा हा इतर पक्षांपेक्षा वेगळा पक्ष आहे. आपलं वेगळेपण कशात आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण आपलं वेगळेपण पण लक्षात ठेवलं, तर नक्कीच आपण पार्टी विथ डिफ्रन्स राहू. जे काम नाही करायला पाहिजे, ते काम ज्यांनी केलं आणि त्या नाराजीतून लोकांनी आपल्याला निवडून दिलं. तेच काम आपण करणार असू तर त्यांच्या जाण्यात आणि आपल्या येण्यात कोणताही फरक राहणार नाही. पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना सत्तेचा वापर हा जनतेच्या भल्यासाठी केला पाहिजे, असा सल्लाही नितीन गडकरी यांनी दिला.