“आम्ही राजकारणी आहोत, साधू-संत नाही”; नितीन गडकरींचं विधान
![Nitin Gadkari said that we are politicians, not saints](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Nitin-gadkari-1-780x470.jpg)
आम्ही पूजा-पाठ करण्यासाठी नव्हे, तर निवडणूक जिंकण्यासाठी आलो आहे
मुंबई : १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात करात सवलत, मोफत अन्नधान्य आणि विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. यावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपलं मत मांडलं आहे.
प्रत्येक नेता निवडणूक डोळ्यासमोर ठेवत असतो, आम्ही तेच करतोय. आम्ही राजकारणी आहोत, साधू-संत नाही. आम्ही पूजा-पाठ करण्यासाठी नव्हे, तर निवडणूक जिंकण्यासाठी आलो आहोत. चांगले काम केलं, तर निवडणूक जिंकू. जो चांगलं काम करेल, लोकं त्यालाच निवडून देतात. दक्षिणेतील राज्यात मोफत वीज दिली जाते. त्यामुळे तोटा किती होतो, हे पाहिलं जात नाही, असं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले.
९ राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्याआधीच रस्त्याच्या प्रकल्पांच्या कामास सुरूवात झाली आहे, असा आरोप विरोधक करत आहेत. यावर कोणतं असं राज्य आहे की, तिथे रस्त्यांच्या कामास सुरूवात झाली नाही. सर्व राज्यात रस्त्यांची कामं सुरू आहेत. एकाही राज्याचं नाव सांगा, जिथे रस्ते बांधले जात नाहीत, असंही नितीन गडकरी म्हणाले.
येणाऱ्या निवडणुकीसाठी काय लक्ष असेल असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मी निवडणुकीनुसार विचार करत नाही आणि बोलतही नाही. काम करत राहतो आणि काम करतच राहिलं पाहिजे. हेच माझं लक्ष्य आहे. २०२४ च्या अखेरपर्यंत देशातील रस्ते अमेरिकेसारखे होतील, हे आमचं लक्ष्य आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.
दरम्यान, दिल्ली-मुंबई महामार्गाचं काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ फेब्रुवारीला त्यांचं उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर दिल्ली ते मुंबई १२ तासांत पोहचता येईल. दिल्ली ते जयपूर २ तास, दिल्ली ते हरिद्वार २ तास, दिल्ली ते चंदीगढ अडीच तास, दिल्ली ते श्रीनगर ८ तास, कटरा ६ तास आणि अमृतसरला ४ तासांत पोहचता येणार आहे. नागपूर मधून पुण्याला ५ तसांत पोहचता येणार आहे. त्यासाठी औरंगाबागमधून महामार्गाचं काम सुरू आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.