राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचावेत- संजोग वाघेरे पाटील
![NCP's goal and policies should reach the people- Sanjog Waghere Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/WhatsApp-Image-2021-06-10-at-3.17.10-PM.jpeg)
- राष्ट्रवादी कॉंग्रेसचा 22 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
पिपंरी चिंचवड |
कोरोना संकटात राज्य सरकारसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध प्रकारे जनतेला मदत करण्याची भूमकिा घेण्यात आली. यात नेते, पदाधिकारी आणि सर्वच कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. येणा-या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे आणि लोकनेते शरद पवार साहेब यांचे विचार अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करावे लागणार आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा 22 व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना आज, गुरुवार (दिनांक 10 जून 2021) रोजी मांडले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने पार्टीच्या पिंपरी खराळवाडी येथील मुख्य कार्यालयात पिंपरी येथे माजी महापौर शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, माजी महापौर मंगलाताई कदम, महिला शहराध्यक्षा नगरसेविका वैशाली काळभोर, विद्यमान नगरसेवक भाऊसाहेब भोईर, विठ्ठल उर्फ नाना काटे, मयूर कलाटे, विक्रांत लांडे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
संजोग वाघेरे पाटील वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्य सरकारच्या माध्यमातून कोरोना काळात अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केलेले आहे. पक्षाच्या माध्यमातूनही लोकांपर्यंत मदत पोहचविण्याचा प्रयत्न सतत सुरू असतो. आपणही लोकांना मदत करत आहोतो. जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना आपण मदत करू शकतो. त्यांना आणखी मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आगामी काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक आहे. निवडणुकीची तयारी म्हणून देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगवेगळ्या स्तरावर काम करत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सत्ताधारी भाजपनं मागच्या चार वर्षात केलेल्या कामात अनेक ठिकाणी गोंधळ आहे. अनागोंदी कारभार सुरू आहे. नुसत्या घोषणा केल्या. त्याचा लोकांना कुठेही फायदा झालेला नाही. अनेक प्रकल्प अर्धवट स्थितीत आहेत. काही कामांचे नियोजन चुकलेले आहे. या पद्धतीची कामे पाहून त्यावर ठोस भूमिका घेणे, असे प्रकार नागरिकांच्या लक्षात आणून देण्यासाठी आपल्याला पक्षाच्या ध्येय धोरणानुसार काम करावे लागणार आहे.
माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर मंगला कदम यांनीही मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद कांबळे यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. तर, सामाजिक न्याय विभागाच्या महिला शहराध्यक्ष गंगाताई धेंडे यांच्या वतीने गरजूंना एका महिन्याच्या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.