किरीट सोमय्यांच्या आरोपसत्रावरुन नवाब मलिक संतापले; म्हणाले…
![Nawab Malik's appeal to the people, saying, "This closure will remain strict."](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/nawab.jpg)
मुंबई |
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब, अनिल देशमुख अशा सत्ताधारी मंत्र्यांनंतर आता किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वळवला आहे. मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावेच आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचं किरीट सोमय्या यांनी आपल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. त्यांच्या या आरोपसत्रावरुन आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बेछूट व बिनबुडाचे आरोप करण्याचा उद्योग सुरू केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. ज्या संस्थेची किरीट सोमय्या बदनामी करत होते त्या संस्थेने सोमय्या यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला असून शिवडी कोर्टाने तसे आदेश पारित केले आहेत.
विनाकारण बदनामी करणार्या लोकांच्या विरोधात कायद्याने कारवाई करता येते हे लोकांच्या लक्षात आले असून ही आता सुरुवात आहे असेही नवाब मलिक म्हणाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही किरीट सोमय्या यांच्या विरोधात कोल्हापूर कोर्टात दिवाणी व फौजदारी असे दोन्ही स्वरुपाचे दावे दाखल करण्याचे स्पष्ट केले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. खासदार भावना गवळी, अनिल परब, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ अशा अनेकांवर टीका करत त्यांनी या सर्वांविरुद्ध आपल्याकडे सबळ पुरावे असून आपण त्यांची ईडीकडे तक्रार करणार असल्याची माहिती वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.