विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं का फुटली? नाना पटोले म्हणाले..
![Nana Patole said that those who betray the party will be shown the way out](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Nana-Patole-780x470.jpg)
मुंबई | विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीच्या नऊ तर महाविकास आघाडीच्या दोन उमदेवारांचा विजय झाला. महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसकडे ३७ मते होती. मात्र, प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची केवळ २५ मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसची उर्वरित १२ मते फुटल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले म्हणाले, मागच्या विधानपरिषद निवडणुकीतही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी काही बदमाश आमदारांनी क्रॉस व्होटींग केलं होतं. त्यावेळी ते आमदार कोण होते? याचा पत्ता लागला नव्हता. मात्र, यावेळी आम्ही व्यूरचना आखली होती. या व्यूरचनेत काही बदमाश आमदार अडकले आहेत. त्यांच्याबाबत आम्ही वरिष्ठांना माहिती दिली आहे. ज्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात काम केलं आहे, अशा लोकांना लवकरच बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.
हेही वाचा – ‘जागतिक हवामान बदलांवर उपाययोजना राबविण्यात भारत अग्रेसर ‘; अमिताभ कांत
काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काँग्रेसचे कार्यकर्ते काम करत आहेत. या कार्यकर्तांच्या मेहनतीने आमदार निवडून येतात. मात्र, काही लोक निवडून आल्यानंतर पक्षाशी विश्वासघात करतात, अशा लोकांना आम्ही लवकरच धडा शिकवणार आहोत. हे लोक कोण आहेत, याची माहिती आमच्याकडे आहे. वरिष्ठांचा आदेश आला, की त्यांची नावे जनतेसमोर येईल, असंही नाना पटोले म्हणाले.