राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर नाना पाटेकरांनी केलं भाष्य; म्हणाले “आपल्या मतीप्रमाणे…”
मुंबई |
राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. एकमेकांवर आरोप करताना भाषेचा खालावलेला दर्जा आणि राजकीय पातळी यामुळे सर्वसामान्यांकडून नाराजी जाहीर केली जात आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा हा धुरळा दिवसेंदिवस वाढत असल्याने हे थांबणार कधी अशी भावना व्यक्त होत आहे. यादरम्यान ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. नाना पाटेकर पुण्यातील बाणेर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर प्रतिक्रिया दिली.
राज्यात सध्या सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांबाबत विचारलं असता ते म्हणाले की, “मी कोणाला सांगणार नाही. कोणाला सांगण्याची माझी पात्रता नाही आणि मी सांगूही इच्छित नाही. प्रत्येकजण सुजाण आहे. आपल्या मतीप्रमाणे कसं वागायचं ते ठरवावं आणि त्याप्रमाणे ते वागत आहेत”.
दरम्यान हिजाबवरुन सुरु असलेल्या वादावर विचारलं असता त्यांनी बोलणं टाळलं. “हिजाब वादावर बोलण्यासाठी ही जागा नाही. त्यावर विस्तृतपणे बोललं पाहिजे. मला माझे निती नियम पाळायला हवेत”. “मी कोणत्याही पक्षाचा नाही पण चंद्रकांत पाटील, अजित पवार, उद्धव ठाकरे सगळे माझे मित्र आहेत. सत्ताधारी आणि विरोधक दोघांचीही जबाबदारी आहे कारण आम्ही त्यांना निवडून दिलं आहे,” असं नाना पाटेकर म्हणाले. “नाम संस्थेच्या माध्यमातून काम करताना माझी भूमिका सर्वांप्रती चांगली असली पाहिजे. मला सर्व पक्षांची गरज असते. जे काम करतोय ते सर्वांसाठी असून त्यात सर्वांचा सहभाग असायला हवा. जेव्हा कोणी चुकणार तेव्हा मी बोलणार पण उगाच भाष्य करणार नाही,” असं नाना पाटेकर म्हणाले.