उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादावर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
![MP Supriya Sule's reaction to Urfi Javed and Chitra Wagh controversy](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/chitra-wagh-and-supriya-sule-780x470.jpg)
“तुम्ही दाखवणं बंद करा, लोकं बोलणं बंद करतील”
पुणे : सोशल मीडियावर कायम उर्फी जावेद सध्या चर्चेत असते. उर्फी विरोधात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याने हे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तुम्ही दाखवणं बंद करा, लोकं बोलणं बंद करतील अशी प्रतिक्रिया दिली आहे.
उर्फी जावेदचं प्रकरण जेव्हा मी टीव्हीवर बघितलं तेव्हा मला कैलासवासी अरुण जेटली मला आठवतात. तुम्ही दाखवणं बंद करा, लोकं बोलणं बंद करतील. कोणत्या ही विषयासाठी महिलेविषयी कोणी ही बोलू नये. हात जोडून मी विनंती करते, महिलांबाबत काही बोलून राजकारण करू नये. मुळात मला जनतेनं निवडून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिलेलं आहे. महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी आणि विजेचा तुटवडा हे प्रामुख्याने आव्हान आहेत. याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवं, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
एखाद्या महिला किंवा पुरूषावर आरोप झाला की महिलेला मत विचारलं जातं. कोणत्याही महिलेबद्दल ज्या खालच्या पातळीवर जाऊन टिका केली जाते. नावं ठेवली जातात. त्यावेळी ती कोणाची तरी आई, बहीण, पत्नी, मुलगी आहे. याचा आपण विचार करायला हवा. हे सगळं महिलांबाबतच राजकारण सत्ताधारी पक्षाकडून केलं जात आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस कधीही कमी पडणार नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राजकारण करत असताना आपण जी भाषा वापरतो ती खरोखरच सुसंस्कृत आहे का?प्रत्येक महिला, प्रत्येक कृतीवर आपण बोललेच पाहिजे असे नाही. भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली म्हणाले होते, ज्या दिवशी मीडिया ह्या गोष्टी दाखवणे बंद करेल त्या दिवशी हे थांबेल. मात्र हे दिवसेंदिवस वाढत आहे. रोज पेपर वाचा, बातम्या बघा हे कोणत्या तोंडाने मुलांना सांगायचं, असा प्रश्नही सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.