‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेची ई-केवायसी 18 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; मंत्री आदिती तटकरे

मुंबई | ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमित आर्थिक लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेची सुविधा https://ladakibahin.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर 18 सप्टेंबरपासून दोन महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
मंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी व उपाययोजनांबाबत बैठक घेण्यात आली.
या वेळी त्या म्हणाल्या, “ई-केवायसी प्रक्रियेद्वारे लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण केले जात आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ असून महिला स्वतःच्या मोबाईलवरून काही मिनिटांत ती पूर्ण करू शकतात. अनेक लाभार्थ्यांनी आतापर्यंत ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी.”
सरकारच्या या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना वेळेवर आर्थिक लाभ मिळण्यास मदत होणार असून योजनेंतर्गत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल, असेही त्यांनी नमूद केले.




