‘मराठ्यांना फसवलं तर पुन्हा नव्याने लढाई उभारणार’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
![Manoj Jarange Patil said that if the Marathas are deceived, they will start a new battle](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Manoj-Jarange-Patil-8-780x470.jpg)
Manoj Jarange Patil | राज्य मागासवर्गाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या अहवालानुसार मराठा समाज मागास असल्याचे दिसत असून मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावरून मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणासाठीच्या सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे नाहीच, असा निर्धार त्यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे काही गोष्टी स्पष्ट झाल्या. जे मराठे लढले, त्यांच्यासाठी हा मागासवर्गीय अहवाल आला. जो अध्यादेश काढला आहे, त्यासाठी सगेसोयरे कायदा अंमलबजावणी करावीच लागेल. ज्यांना कुणबीमध्ये अरक्षण नकोय, त्यांनी ते आरक्षण घ्यावे. जे नाही म्हणतात त्यांनी पुरावे दाबून ठेवून आहेत.
हेही वाचा – मराठा समाज सामाजिकदृष्ट्या कसा मागास आहे? छगन भुजबळांचा सवाल
सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करावी लागेल. नाही तर आम्ही कोणालास सोडणार नाही. २० तारखेपर्यंत काही करून अध्यादेशाची अंमलबजावणी करा. हैदराबाद गॅझेट घ्या. सग्या सोयऱ्यासाठी समितीला एक वर्ष वाढवून द्यावे. २० तारखेपर्यंतच्या उपोषणानंतर सरकारने सरकारचे बघावे, मराठा मराठ्यांचे बघेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
सगळा मराठा कुणबीच आहे. मुंबईला गेल्यामुळे फसवणूक झालेली नाही. अंमलबजावणीत फसवणूक झालीय असं तुम्ही म्हणू शकता. सगळ्या मुलींना मोफत शिक्षण एक रूपयाही द्यावा लागणार नाही. कुणीही गोड बोलून मराठ्यांना माघारी पाठवलेलं नाही. समाजाच आणि माझ अतूट नात झालय. समाजामुळे मी वैद्यकीय उपचार घेतले. मराठ्यांना फसवलं, तर नव्याने लढाई उभारेन, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.