‘भुजबळांना थोड्या दिवसात बैलाच्या गोळ्या, इंजेक्शन घ्यावं लागणार’; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
![Manoj Jarange Patil said that Bhujbal will have to take bull pills and injections in a few days](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Manoj-Jarange-Patil-and-Chhagan-Bhujbal-780x470.jpg)
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं असलं तरीही १३ जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. १३ जुलैपर्यंत आरक्षण दिलं नाही तर सरकारला जड जाईल, असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे. तसेच त्यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. भुजबळांना थोड्या दिवसात बैलाच्या गोळ्या, इंजेक्शन घ्यावं लागणार, असं ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, संविधानाच्या पदावर बसूनही छगन भुजबळांना कळत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी सर्वांना वेड्यात काढलं. मी हैदराबाद गॅझेट आणलंय. १८८४ ची जनगणना आहे. रेकॉर्डेड ओरिजिनल प्रिंट आहे. यात सर्व मराठा समाज कुणबी आहे. भूमि अभिलेख ३७ क्रमांकावर आहे. हे बोगस आहे का? तुम्हाला दिलेलं आरक्षणच सुरक्षित नाही.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही. ते बधिर झाले आहेत. त्यांना काही दिवसांनी बैलाच्या गोळ्या द्याव्या लागणार आहेत. मोठं इंजेक्शन द्यावं लागणार आहे. सर्वांत जास्त ओबीसीचं वाटोळं त्यांनी केलंय. आपण दोघांनी (मराठा आणि धनगर ) शहाणं व्हायला पाहिजे. या संधीचं सोनं केलं पाहिजे. धनगर मराठा, मुस्लीम आणि दलित एकत्र आले तर सत्ताच हस्तगत होऊ शकते. तुम्ही नाही दिलं तरीही आम्ही ओबीसी आरक्षणात जाणार आहोत. मराठा आणि कुणबी एक आहेत हे सिद्ध झालंय. आमच्याकडे नोंदी आहेत. त्यापेक्षा डोकं लावा आणि सत्ताच हस्तगत करा, असं जरांगे पाटील म्हणाले.
हेही वाचा – राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली? प्रतीक्षेत असलेल्या नेत्यांची मंत्रीपदी लागणार वर्णी?
एसटी आरक्षणाला एवढी ताकद लावली असती तर आतापर्यंत आरक्षण मिळालं असतं. तरीही आम्ही तुम्हाला विरोधक मानलं नाही. मी एकाही नेत्याला दुखावलं नाही. आपण कांदा फोडून खाणारे लोक आहेत. त्यामुळे नेत्यांचं ऐकू नका. कदाचित एक दोन वर्षांनी धनगर बांधवांनी ठरवलं की एसटीत आरक्षण घ्यायचं, त्यांना मिळू शकतं. १३ तारखेच्या आत आरक्षण नाही दिलं तर इतकं जड जाईल की त्याच दिवशी कळेल, असा इशाराही त्यांनी दिला.
ओबीसी आणि धनगरांना सांगणं आहे की यांच्या (छगन भुजबळांच्या) नादाला लागू नका. राजकीय उदय होण्याची क्षमता आहे. हे बाद झालेले केस आहेत. तुम्ही तुमचं करिअर यांच्या नादाला लागून खराब करून घेऊ नका. आम्ही ओबीसीत आलो तरीही तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. मग मराठ्यांची नाराजी का पत्करत आहात? एकसंघ राहा. तुमचं एसटीतील आरक्षण मिळेल. आतापर्यंत करोडो पोरांना आरक्षण मिळालं असतं. आमचं भांडण तुमच्याशी नाही, सरकारशी आहे. येवलावाल्या नाही पालथं केलं तर नाव सांगणार नाही. कितीही आडवे या, तरीही ओबीसीतच जाऊन दाखवणार, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.