‘अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी विशेष तरतूद कराः संजय राऊत
![Make special provision for Maharashtra in the budget: Sanjay Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Sanjay-Raut--780x470.jpg)
मुंबईः अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचा अर्थसंकल्प मांडत आहेत. मोदी सरकारचा हा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. या वर्षात देशात वेगवेगळ्या ९ राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. तसेच येत्या १४ महिन्यांत लोकसभा निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पात केंद्र सरकार कोणकोणत्या आकर्षक घोषणा करणार तसेच या अर्थसंकल्पातून सामान्य माणसाला काय मिळणार? ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनीदेखील या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र तसेच मुंबईसाठी विशेष तरतूद करावी, अशी मागणी केली आहे. तसेच हा अर्थसंकल्प भाजपाचा नव्हे तर जनतेचा आहे. हा पैसा भाजपाचा नव्हे तर लोकांचा आहे, असेही राऊत म्हणाले. ते आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
“महाराष्ट्रच्या बाबतीत केंद्र सरकारने राज्यासाठी एक वेगळी आणि स्वतंत्र भूमिका घेणे गरजेचे आहे. मुंबईसाठीही केंद्राने वेगळी भूमिका घेणे गरजेचे आहे. मोदी वारंवार मुंबईचा दौरा करत आहेत. याचा अर्थ हा आहे की मुंबई महानगरपालिका हे त्यांचे लक्ष आहे. त्यांनी मुंबईला फक्त राजकारणासाठी येऊ नये. मुंबईला येताना काहीतरी घेऊन यावे. मुंबईने सातत्याने देशाला काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. अनेक गरीब राज्यांचं पोट मुंबईमुळे भरलं जातं. मुंबईत अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे या प्रकल्पांसाठी केंद्राची गरज आहे. त्यासाठी आम्ही सरकारला पत्राने व्यवहार केला आहे. त्यासंदर्भात पंतप्रधान आणि अर्थमंत्री विचार करतील,” असे संजय राऊत म्हणाले.
मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न…
“अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. लाखोंचे रोजगार देणारे उद्योग गुजरातमध्ये नेण्यात आले. या अर्थसंकल्पामधून काही भरपाई दिली जात असेल तर आम्ही केंद्र सरकारचे आभार मानू. हा पैसा भाजपाचा नसून जनतेचा आहे. हे बजट भाजपाचे नसून जनतेचे आहे,” असेही राऊत म्हणाले.