पत्रकार दिन विशेष : ज्येष्ठ पत्रकार संजीव शाळगावकर यांचे मनोगत!
‘टाइप सेट’चा जमाना ते डिजिटल मीडियापर्यंत बदललेली पत्रकारिता
गेल्या ४० वर्षांच्या कारकीर्दीत केसरी, पुढारी, ऐक्य, तरुण भारत, सामना, प्रभात अशा अनेक दैनिकात काम केले. प्रशिक्षित उपसंपादक ते संपादक अशी अनेक पदे भूषवली. मध्येच एक छोटासा सॅटलाईट न्यूज चॅनेलचा प्रयोगही झाला. हजारो माणसे जोडली.
आज मागे वळून पाहताना या दीर्घकाळात हे क्षेत्र किती आमूलाग्र बदलले, याची जाणीव झाली आणि या बदलांचा आपण साक्षीदार होतो, याचा अभिमानही वाटला. खिळे जुळवून टाइप सेट करण्याच्या जुन्या प्रक्रियेपासून ते आधुनिक काळातील डिजिटल प्रक्रिया या ४० वर्षात अगदी जवळून पाहता आली.
आकाशवाणीवरील बातम्या ऐकून आणि दूरदर्शन पाहून नॅशनल बातम्या करण्याचा, पीटीआय चे भाषांतर, रात्रपाळीला चटकदार हेडिंग, पहाटे पडलेल्या दरोड्याची बातमी घेणे जसा अनुभव घेतला, तसा आधुनिक काळातील वृत्तवाहिन्यांचा गोंगाटही अनुभवला. रोलच्या कॅमेऱ्यावरील फोटोग्राफीप्रमाणे डिजिटल फोटोग्राफीही बघितली.
‘माणसाला कुत्रे चावले तर ती बातमी नाही, तर माणूस कुत्र्याला चावला’ तर ती बातमी या मूलभूत तत्त्वाप्रमाणे वेगळ्या बातम्या करण्याचा आणि त्या पत्रकार मित्रांकडून मिळवण्याचाही अनुभव या काळात घेतला. आता मात्र कुत्रे कोणालाही न चावता किंवा माणूस कुत्र्याला न चावताही बातमी केली जात असल्याचा अनुभवही घेत आहे.
साहजिकच, अफवा आणि बातमी यातील फरकच नष्ट झाला आहे. सोशल मीडियामुळे प्रत्येक जण पत्रकार, संपादक आणि तज्ज्ञ झाला आहे. बातम्यांच्या या गोंगाटात वृत्तपत्र याच माध्यमाकडून काही अपेक्षा आहेत. बाकी एकूणच सगळा आनंद आहे.
आजवर या प्रवासात भेटलेल्या सर्वाना शुभेच्छा आणि नव्याने या दिंडीत आलेल्यांनाही शुभेच्छा.. सध्या सोशल मीडियाच्या नव्या प्रवाहात गटांगळ्या खात का होईना, पोहतो आहे. पत्रकारिता कुठे जाणार हे माहीत नाही, फक्त पोहणे माझ्या हातात आहे !