“मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून खोटे गुन्हे दाखल”; जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल
![Jitendra Awad said that false cases were filed on the order of the Chief Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/eknath-shinde-and-jitendra-awhad-780x470.jpg)
नशीब बलात्काराचे गुन्हे दाखल करायला सुरूवात केली नाही
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप केला आहे.
कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करणं सोपं असतं. नशीब म्हणजे अद्याप बलात्काराचे गुन्हे दाखल करायला सुरूवात केली नाही. कारण विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी केवळ पोलिसांना आदेश द्यावा लागतो. पोलीस म्हणणार बलात्कार केला..वैद्यकीय अहवालाबद्दल विचारलं तर..रिपोर्ट येतील तेव्हा बघू..मी माझ्यावर पहिली केस टाकली तेव्हाच सांगितलं होतं, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
त्यांनी कायद्याने तीन तेरा वाजवले आहेत. याबाबत मी पोलिसांना अजिबात दोष देत नाही, मुख्यमंत्र्यांच्या आदेशासमोर ते बिचारे काय करणार? कारण पोलीस आयुक्तच फोन करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश देतात. न्यायालयात खोटी प्रतिज्ञापत्रे सादर केली जातात. न्यायप्रक्रियेतला न्याय त्यांनी बाजुला काढून ठेवला आहे. त्यांनी नवीन न्याय प्रक्रिया सुरू केलीय, जी त्यांच्या घरातून चालतीय, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी नरेश मणेरा यांच्यासह १० ते १२ जणांविरोधात कासरवडवली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नरेश मणेरा यांना कासारवडवली पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर काही वेळातच त्यांना जामीन मंजूर झाला.