‘हसन मुश्रीफ यांना काहीही करून अडचणीत आणायचं..’; ईडी छाप्यानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
![Jayant Patil said that Hasan Mushrif wants to get into trouble by doing anything](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/hasan-mushrif-and-Jayant-Patil-780x470.jpg)
सत्ताधाऱ्यांना कुणी विरोधच करायचा नाही ही मानसिकता
कागल : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानावर ईडीकडून आज सकाळी पुन्हा छापेमारी सुरू केली आहे. माहितीनुसार, आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना प्रकरणात ईडीची ही छापेमारी सुरू असल्याचे म्हटले जात आहे. या सगळ्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ईडीने अशा प्रकारे हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा धाड टाकली आहे ही बाब धक्कादायक आहे. कितीवेळा धाड टाकली जाणार आहे? मुंबई हायकोर्टाने याच प्रकरणांची सुनावणी झाली त्यावेळी कोर्टाने मतं व्यक्त केली की एजन्सीजचा गैरवापर केला जातो आहे. लोकांच्याही या गोष्टी लक्षात आल्या आहेत ही मतं हायकोर्टाने व्यक्त केल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी अशा प्रकारे धाडसत्र राबवलं जातं हे आश्चर्यकारक आहे. हसन मुश्रीफ यांना त्रास द्यायचा आणि काहीही करून अडचणीत आणायचं हाच अजेंडा यामागे दिसून येतो आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
याचा निषेद करावा तेवढा कमीच आहे. अशा पद्धतीने भारतात कारवाया केल्या जाणार असतील तर सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल. सत्ताधाऱ्यांना कुणी विरोधच करायचा नाही ही मानसिकता आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
नेमकं काय आहे प्रकरण?
कोल्हापुरातील साखर कारखाना खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या व्यवहारात काळा पैसा गुंतविण्यात आल्याचेही ते म्हणाले. तसेच मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयांनी साखर कारखाना खरेदी केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर ईडीकडून मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील मालमत्तांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली होती.