‘मला भेटायचं असेल तर आधार कार्ड बरोबर घेऊन या’; कंगना रणौतचं विधान
MP Kangana Ranaut | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून कंगना रणौत खासदार झाल्या आहेत. अभिनेत्री ते खासदार हा त्यांचा प्रवास कायम चर्चेत राहिला. आता कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. कंगना रणौत यांनी आपल्याला भेटण्यासाठी लोकांनी आपले आधार कार्ड बरोबर घेऊन यावे, असं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.
कंगना रणौत नेमकं काय म्हणाली?
हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघात माझं कार्यालय आहे. प्रत्येकाने आपल्या समस्या किंवा तक्रारी कागदावर लिहून ठेवल्यास त्या ऐकणं आणि समजून घेणं सोप्प होईल. अनेकवेळा पर्यटक भेटायला येतात आणि सर्वसामान्यांची गैरसोय होते. त्यामुळे मंडी मतदारसंघ क्षेत्रातील आधार कार्ड बरोबर घेऊन यावं. तसेच तुमचं जे काम असेल ते एका कागदावर लिहून आणा. याचं कारण म्हणजे कोणालाही काही अडचण येऊ नये. अन्यथा काय होतं की पर्यटक जास्त येतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना अडचण निर्माण होते. त्यामुळे मंडी मतदारसंघ क्षेत्रातील आधार कार्ड आणि कामासंदर्भातील लेटर बरोबर आणा, असं कंगणा रणौत म्हणाली.
हेही वाचा – फाईलमध्ये पैसे का ठेवले? व्हायरल व्हिडीओवर मेघना बोर्डीकरांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या..
काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंग यांनी कंगना रणौत यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, लोकप्रतिनिधीला कुणीही भेटू शकतो. कारण लोकांच्या समस्या दूर करणं ही जबाबदारी लोकप्रतिनिधीची असते. त्यामध्ये सर्व समाजातील लोकांना भेटणं त्यांची कामे करणं ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र, त्यांना भेटण्यासाठी आधार कार्ड बरोबर आणावं असं सांगण्याची गरज नाही, अशी टीका विक्रमादित्य सिंग यांनी केली.