मी केलेल्या कामांवरच कोल्हे निवडून आलेत, नाहीतर…
शिवाजीराव आढळरावांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
![I have made Kamavanvarch Kholhe Kekhun Aalet, otherwise...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/कोल्हे-आढळराव-1-780x470.jpg)
पुणे : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरुर मतदारसंघात एकमेकांवर जोरदार टीका-टिपण्णी सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीच्या निमित्ताने आढळराव पाटील पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्याचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
“डॉ. अमोल कोल्हे यांनी जुन्नर तालुक्यातील कोपरे मांडव हे गाव दत्तक घेतलं होतं. त्या गावातही आमच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. त्यांना स्वतःचं काहीही दिसत नाही, स्वतःचा तालुका, त्यांनी दत्तक घेतलेल्या गावातही त्यांनी काही केलं नाही आणि ते राज्याचं काय सांगत आहेत. कोल्हेंच्या जाहीरनाम्यात मी केलेली विकास कामे असून, माझ्या कामावरच कोल्हे निवडून आले, तर मतदारसंघातील कोल्हेंची कामेदेखील मलाच करावी लागतात”, असं म्हणत आढळराव पाटलांनी कोल्हेंवर निशाणा साधला आहे..
“जे प्रकल्प ५ वर्षापूर्वी होते ते देखील आत्ता आहे त्याच परिस्थितीत आहेत. लोक सकाळपासून मला त्यांच्या अडीअडचणी सांगत असतात. मी खासदार नसताना देखील काम करत आहे. कोल्हे यांचं कर्तव्यदेखील मलाच पार पाडाव लागत आहेत”, असंही आढळराव पाटील म्हणाले आहेत.
“शिरूर मतदारसंघातील जनतेचा माझ्यावर विश्वास असून २०१४ च्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ३ ते साडे ३ लाख मतांचं लीड मला मिळणार आहे. तसेच हडपसर मतदार संघातून कमीत कमी १ लाख मतांचं लीड मला मिळेल” असा विश्वास शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.